मनसेची मागणी, हातगाड्यांनी व्यवसाय करणारे अडचणीत
गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे हातगाड्यांवरुन वडापाव, चहा, भेळ आदी खाद्यपदार्थ विकणारे अडचणीत सापडले आहेत. शासनाची नियमावलीच अशी आहे की ती सामान्य हातगाडीवाले पूर्ण करुच शकत नाहीत. आणि एकदा शासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेत आलो की त्यांच्या कार्यवाहीसमोर आपण टिकू शकत नाही. त्यामुळे नेमके काय करायचे याची चिंता आता हातावर पोट असलेल्या हातगाडीद्वारे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना भेडसावत आहे. MNS demands food inspection from administration


तालुक्यातील अनेक हॉटेलमधील कामगार, व्यवसायिक टपरीवाले, पाणीपुरी, आईस्क्रिम, थंडपेय विक्रेते, बेकरी चायनीज व्यवसाय आहेत. शृंगारतळी ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे बरेचसे व्यवसाय आहेत. परंतु हे व्यवसायिक पाणी कोणते वापरतात? त्यांच्या आजुबाजूला स्वच्छता आहे की नाही अथवा तेथील पदार्थांचा दर्जा काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी कधीतरी तपासणीला येतात आणि काही ठराविक व्यापाऱ्यांना भेटून जातात? त्यामुळे व्यवसायिकांचे अन्न पदार्थ विक्री परवाने व त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात यावी तसेच शृंगारतळी बाजारपेठ भरणाऱ्या आठवडा बाजारातील वजन, काटे, खाद्यपदार्थ कोणत्या प्रतिचे आहेत हे तपासावे व याचा अहवाल आम्हाला कळवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. MNS demands food inspection from administration