कोकणात काजू बोंडा पासून मद्य/शीतपेय तर पडिक गवता पासून कागद/पुट्टे निर्मितीचे कारखाने उभारावेत
गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्याला विविधतेने नटलेला निसर्गरम्य आणि विस्तीर्ण असा कोकण विभाग लाभलेला आहे. कोकण म्हटले की कोकण किनारपट्टीला लाभलेला अथांग असा अरबी समुद्र. कोकण किनारपट्टीवर नारळी फोफळींच्या बागा तर कोकण माथ्यावर सह्याद्रीच्या रांगा आणि या दोन्ही मधील भाग हा उंच-सखळ, चढ-उताराचा, नदी-नाल्यांचा, दऱ्या-खोऱ्यांचा, काही भाग खडकाळ कातळवटीचा तसेच वरकस जमिनी तर काही पठारी जमीनीचा. अशी भौगोलिक परिस्थिती कोकणाची आहे. Ambekar’s demand to the government


कोकणातील सदर भागात मोठय़ा प्रमाणात हापूस आंबा, काजूंच्या बागा आहेत. हापूस आंबा आणि काजू हे एक कोकणातील उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे. काजू बी पासून काजूगर हा सुका मेवा म्हणून वापरला जातो. तर बी काढून काजू बोंड बहुधा फेकून दिली जातात, त्या पासुन मद्य(काजूफेणी) किंवा शीतपेय तयार करता येऊ शकते. कोकणात वानर, माकडे यांची मोठ्या प्रमाणात वाढती संख्या आणि उपद्रवी वन्य पशू रानडुक्कर, रानगवे इत्यादी नुकसान करणाऱ्या प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून कोकणातील शेतकऱ्यांनी व बागायतदारांनी शेती तसेच बागायती करणे सद्या सोडून दिलेले आहे. सरकार कडून सुद्धा या समस्यांवर काही ठोस उपाय योजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतीक्षेत्राच्या ओसाड रानमाळावर सुद्धा विस्तीर्ण गवताळ प्रदेश वाढत चाललेला आहे. या गवताळ रानमाळावर अनेक वेळा काही माथेफिरू व्यक्तीं कडून आग/ वनवा लावला जातो. त्यामुळे आंबा व काजू बागायतींचे फार मोठे आर्थिक नुकसान सुद्धा होते आहे. Ambekar’s demand to the government


कोकणातील ओसाड रानमाळावरील असे गवत /वैरण म्हणून काढल्यास आपल्या राज्यातील मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात तसेच राज्यातील गोशाळेतील जनावरांसाठी चारा / वैरण म्हणून उपयोग करता येऊ शकते. तसेच गवता पासून कागद किंवा पुट्टा सुद्धा तयार करू शकतो. तसेच काजू बी काढून असे फेकून दिली जाणारी काजू बोंड पासून मद्य (काजूफेणी) किंवा शितपेय बनविणारे कारखाने आणि वरकस पठारावरील गवता पासून कागद किंवा पुट्टे बनविणारे प्रदुषण विरहित कारखाने कोकणातील प्रत्येक तालुकात उभारल्यास स्थानिक बेरोजगार तरूण/ तरूणींना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तरी असे उद्योग-धंदे /कारखाने कोकणातील सर्व तालुक्यांत उभारून कोकणातील सुशिक्षित बेरोजगारांच्या / महिलांच्या हाताला काम मिळावे. यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी, महोदयांनी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केली आहे. Ambekar’s demand to the government