प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे : छंद वैविध्याची किमया साधणारा साहित्यिक
Guhagar News : “आसवांचे हार झाले “हा रमेश सरकाटे यांचा अथर्व पब्लिकेशन ने २नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेला गझल संग्रह आहे. याची प्रस्तावना जेष्ठ गझलकार ए.के.शेख यांची आहे. मलपृष्ठ मजकूर गझल गायक भिमराव पांचाळे यांचा आहे. या गझलसंग्रहात एकूण ९८ गझल आहेत. त्यातव्योमगंगा, मंजूघोषा, भुजंगप्रयात, राधा, स्त्रग्विनी, आनंदकंद, मंदाकिनी, देवप्रिया, वैखरी, ब्रम्हपुरक, कलिंदनदिनी, मनोरमा, स्वरगंगा, भामिनी, विधाता, विद्धुन्माला, लज्जिता, हिरण्यकेशी, अनलज्वाला, सुखराशी, देवराज, शुद्धसती, वियदगंगा, प्रसूनांगी, पादाकुलक, सूरमंदिर या वृत्तातील आहेत. वृत्तांपैकी जास्तीत जास्त गझल आनंदकंद वृत्तात आहेत. हे वृत्त लेखनासाठी सोपे जाते. Tribute to Ghazal singer Ramesh Sarkate
रमेश सरकटे यांच्या गझलांचा भाव बहुविध आहे. आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेली ही गझल आहे. दलित कविता जेंव्हा जन्मास आली तेंव्हा ती विद्रोह घेऊन जन्मास आली. तो विद्रोह नकार छंदाच्या बाबतीतही होता. त्यामुळे ती मुक्तछंदात आविष्कृत झाली. आमच्या कवितेला कविता म्हणा अथवा म्हणू नका. आम्ही लिहीत राहणार .याभुमिकेतून बरीचशी कविता लिहीली गेली. तिच्यात काव्यमूल्य नाही. आनंद नाही. कंठाळी, आक्रस्थाळी असे आक्षेप तिच्यावर घेण्यात आले. दलित कवितेचे विविध टप्पे पाहता. आजच्या पिढीतील नव्या दलित कवींनी छंदांना स्वीकारावे ही लक्षणिय बाब आहे ते ही गझल सारखा सशक्त काव्यप्रकार. त्यामुळे दलित कवितेतील छंदमुक्ती कडून छंदवैविध्याकडचा प्रवास आपणास सरकाटे यांच्या गझल लेखनातून जाणवतो. गझल म्हणजे प्रणय भावना व्यक्त करणारा काव्यप्रकार ही ओळख पुसली जाऊन सामाजिक आविष्कार गझल करू शकते. याचे प्रत्यंतर आजच्या गझलेतले गझलकार आबेद शेख, विजय वडवेराव, नितिन देशमुख, ए.के.शेख, यासारख्या गझलकारांच्या रचनांवरून लक्षात येते. सरकाटे यांच्या अभिव्यक्तीचा पिंड हा सामाजिक आहे.आपल्या गजल प्रेरणे विषयी ते म्हणतात. Tribute to Ghazal singer Ramesh Sarkate
“दु:ख मी बावन कशी सांभाळले हे
दु:खितांना गजल मालामाल करते”
गजल हे विरेचनाचे माध्यम आहे. त्यामुळे गजलेत व्यक्त झालेला विरोधात्म आशय प्रभावी आहे. दु:खाला बावनकशी सोनं म्हणून सांभाळणे ही प्रक्रिया जीवनातील सर्व अंगाचा स्वीकार आहे. माती आणि सोने दोन्ही समान हा भाव त्या ठिकाणी आहे. दु:खाचे विरेचन करणे हे अॅरिस्टाॅटलने साहित्याच्या परिणामात सांगीतले आहे. गजलेच्या विरेचनाने नवी जगण्याची उर्जा प्राप्त होते. गजल हीच कवीच्या जगण्याची प्रेरणा आहे. तीची भूमिका वाटाड्याची आहे. आयुष्यातील येणारी संकटे त्यावर यशस्वीपणे मात करण्याचे काम गजल सखी बनूनच करीत असते. प्रत्येक दु:खाच्या वेळी ती सात्वन करते. आपल्या हद्यातील सलांबद्दल आणि स्वभावबद्दल गजलकार म्हणतो.
”वेदनांची खाजगी खातीरदारी
ह्रदय माझे हेच सालोसाल करते”
मनातील आठव पावसाप्रमाणे येत राहतात. त्यांचा अनुबंध पापण्या आणि हुंदके याच्याशी आहे त्यांचे नाते अबाधित आहे. दु:ख व्यक्त करणे हे खरे जोखमिचे काम आहे. पापण्या आणि हुंदका यांच्या संवादातून व्यक्त होणार शेर म्हणजे छान इंद्रिय प्रतिमांची गुंफण आहे. शेवटच्या शेरातून या दु:खाचा संबंध हा वैयक्तीक दुखाशी नसुन तो सामाजिक दु:खाशी असल्याचे नाते स्पष्ट केले आहे.
”जिंदगानी ची लढाई हारलो मी
शम्बुकाचे चळवळे मन चाल करते”
८८ क्रमांकाच्या या गजलेतून कवीची गजलविषयक भूमिका स्पष्ट झाली आहे. दलित कवितेत वेदना व्यक्त झाली. तशीच सरकटे यांच्या गजलेमधुनही व्यक्त झाली. गतकाळातील आयुष्यावर कवीने भाष्य केले आहे. पहिल्या पिढीतील लोकांच्या वाट्याला दारिद्य आले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकांचा “शिका संघटीत व्हा संघर्ष करा” हा मंत्र मनात ठेवला. तो नव्या पिढीला दिला.त्यातूनच दुसरी पिढी उभा राहिली. बाबासाहेबांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी संविधानिक क्रांती केली या संदर्भात तो म्हणतो
”उतरंड उभी कैक पिढ्यांची -जातीमधली
भिमरावाने झटक्यात बघा कशी पाडली”
दलित समाजाने केलेली प्रगती ही भिमाच्या क्रांतीने झाली .याची जाणीव त्याच्या मनात आहे.हजारो वर्षांचा काळोख नष्ट करण्याचे कार्य भिमाने केले आहे.त्याची कृतन्यता कवी व्यक्त करत राहतो.
”प्रगतीसाठी शिक्षण घेण्या सांगत गेला
दारिद्र्याची व्यथा भिमाने खरी ताडली”
बाबासाहेबांनी समतेचा विचार दिला त्यामुळे तेच समतेचे पाणी त्याच्या नसात मुरत गेले आहे. वर्ण भेदावरही गजलकाराने हल्ला चढविला आहे. रक्तातील लाल रंग हा सगळीकडे समान आहे. आम्ही माणसे आहोत तरी आपण का भेदाभेद करत असतो हा गजलकारास पडलेला प्रश्न आहे. मी जरी दारिद्री असलो तरी माझ्या मनात समता आहे. त्यानुसार माझ्या झोपडीचे दरवाजे सर्वांसाठी खुले राहणार आहेत. पुर्वीच्या दलित जीवनाला नकार देऊन गजलकाराने आता कात टाकली आहे.हे विद्रोहाचे पाणी पेटले आहे. आता भूतकाळात जमा झाले आहे. न्याय हा सहज मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो.दीर्घ काळाच्या संघर्षानंतर बदललेले जीवन हा त्यांच्या गजलांचा विषय आहे. परिस्थितीती बदलली आहे दलित समाजात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्या बद्दल तो म्हणतो. Tribute to Ghazal singer Ramesh Sarkate
”एक ठोसा भेटल्यावर त्यास उत्तर देत आहे
हारल्यागत का करू आता मी पुढे गाल माझे”
भूतकाळात दलितांची स्थिती खालावलेली होती.जुना मार्ग परंपरेत नेणार परंपरा शरण होता.तोच अवनतीला कारणीभूत होता.डॉ.आंबेडकरांनी धर्मांतर केले.नवीन बुद्धधर्म दिला .तो समतेचा शांततेचा होता.परिवर्तनाचा होता.तोच धम्ममार्ग गजलकाराची ढाल झाला आहे.त्यांच्या प्रमाणे इतर समाजातही सुधारणा झाली.परंतु पुढे गेलेल्या समाजाने बाबासाहेबांची चळवळ पुढे चालविली पाहिजे असे मनोमन त्यास वाटते.
”शिकून मोठा जरी जहाला चळवळ तू का विसरत गेला
भलेच अपुले करून वेड्या झटून भीमजी झिजून गेले”
भीमरायाचा त्याग ,निष्ठा ,संकटांशी दोन हात करण्याची तयारी,त्याचा अभ्यास ,यामुळे सार्यांनी त्यास काळजाच्या सिंहासनावर बसविले.माय बाप सखा बंधु सर्वकाही होऊन दलित समाजास सुखाचे दिवस त्यांच्यामुळेच आले.त्याच्या प्रकाशातच पुढच्या पिढ्यांनी मार्गक्रमण केले.सर्व समाजाची अस्मिता त्यांच्यामुळेच वाढली.मनामनामध्ये निळाईची ज्योत त्याने लावली.परंतु हे विसरलेला समाज ही आहे स्वार्थात अंध झालेल्या समाजावर कवीने भाष्य केले आहे.
”मिळून उच्च नोकरी कृतघ्न होत चालले
कितीक स्वार्थ साधण्या समाज विकत चालले”
एव्हढेच नाही तर भीमरायाच्या नावाचा लिलाव अशा लोकांनी मांडला आहे.त्याचा उबग सार्या चळवळीला आला आहे.अनेक गटतट निर्माण झाले वादविवाद निर्माण झाले.तरीही कवी आशावादी आहे हे ही दिवस बदलतील म्हणून. दलित चळवळीचा आजचा लेखाजोखा विविध शेरांमधुन गजलकार मांडतो आहे.
भाकरी पेक्षा इज्जत प्यारी असल्यामुळे स्वाभीमानाचा धडा बाबासाहेबांनी शिकविला. धर्माधतेला तिलांजली मिळाली. वेदशाही मोडीत निघाली. कालचक्र जे फिरले ते भिमामुळेच फिरले. चळवळीसाठी काय करायला याचा आलेख त्याने मांडला. शिक्षणाचे दान त्याने दिले त्यामुळे सुखाची पर्वणी लाभली. बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही बहुजनांची क्रांती होती.जातीप्रथेला गाडणारी चळवळ त्यांनी निर्माण केली.दुर्बलांना आधार देण्याचे काम त्यांनी केले.त्यांच्या त्यागाविषयी गजलकार म्हणतो Tribute to Ghazal singer Ramesh Sarkate
“श्रीमंत तो जगाला दिसला खराच असता
पण आमची गरीबी सोशीत सूर्य आला”
बाबासाहेबांची प्रबळ प्रेरणा असल्यामुळे गजलकाराचा आत्मविश्वास वाढला आहे.त्यामुळे आपला उद्देश तो सहज साध्यकरूशकतो.जातीयता गाडण्याचे ध्येय पर्ततेस जाणार आहे याचा आशावाद त्याच्या मनात आहे.एक दिवस यशाचे निळे तोरण बांधले जाईल असे त्यास वाटते. शिक्षण हीच दौलत आहे.आपले सामर्थ्य दाखविण्याची वेळ आली आहे.
“घटनेमुळेच आहे सन्मान संसदेला
करण्यास नवल आता लावू नभास सार्या”
जुना प्रवास संपला आहे नवा प्रवास सुरू झाला आहे याची जाणीव गजलकारास झाली आहे.
”ओढून गावगाडा भलताच त्रास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला”
भुतकाळात हाल अपेष्टा काढल्या दारिद्यात दिवस गेले.परंतु ते दिवस राहिले नाहीत.आपला समाज बदलला परंतु इतर दलित समाज तसाच आहे त्याचे दु:ख त्याला आहे.आदीवासींचा प्रश्न ही गजलकार मांडतो आहे याचा अर्थ त्याची दृष्टी व्यापक आहे.डॉ आंबेडकरांनी स्त्रीयांसाठीही कार्य केलेहिंदू कोडबील मांडले .त्याची आठवण गजलकार करून देत आहे
”बायकांना बंद होते उन्नतीचे मार्ग सारे
मुक्त केले भीमबाने तूज नाही होश का”
एक व्यापक जाणीवेने गजलकार लिहीतो आहे.वंचित शोषितांचे दु:ख प्रश्न मांडतो आहे.ज्यांच्यासाठी कुणी नाही त्यांच्यासाठी तो आहे ही त्याची भूमिका आहे.काही गजलांधुन मानवतावादी, मार्क्सवादी भूमिका येते.त्यातून त्यांच्या जाणीवा समृद्ध आहेत हे जाणवते
”राजवाडे बांधताना रक्त सांडे शोषितांचे
अन् बळी तो कान पिळतो येथला सिद्धांत आता”
मानवतावाद हे दलित चळवळीचे धेय्य आहे.त्यामुळे अन्याया विरूद्ध ही चळवळ नेहमी उभी राहीली आहे.याचळवळीच्या कार्याविषयी गजलकार म्हणतो
”दुर्जनांना नष्ट करण्या दंड करते भीमसेना
टोचणारे शब्द त्यांचे बंद करते भीमसेना”
विरोधकांशी सामना करणे.स्वातंत्र्य समता बंधुता यांचे राज्य स्थापन करणे.शिक्षणाचा प्रसार करणे प्रबोधन करणे.संकटात मदत करणे.वाईटाला धडा शिकविण्याचे काम भिमसेना करते.आरक्षणामुळे समाजाची प्रगती झाली याची जाणीव त्यास आहे.
”झाले कितीक मोठे आरक्षणामुळे रे
दिधली प्रगत कराया तू जाण संसदेला” घटनेची महानता बर्याच गजलांमधुन आली आहे आजच्या दलित समाजाची स्थितीगती चळवळीचा लेखाजोखा मांडणारी ही गजल आहे.याशिवाय आत्मजाणीवेच्या सामाजिक भाष्य असणार्या तुरळक प्रेमविषयक गजल यात आहेत.गजलकार कल्पना चमत्कृतीपेक्षा वास्तववादीरितीने गजलांचे लेखन करतो आहे त्यामुळे सामाजिक भान व्यक्त करणे हा त्याचा गाभा आणि बांधीलकी सुद्धा आहे.विशिष्ट विचारसरणीच्या अंगीकारामुळे आपल्या जीवनाशी प्रामाणिक राहून लिहीली असल्यामुळे बर्याचअंशी सहजता व गजलीयत साधली गेली आहे .व्यक्त होण्याची शैली स्वंतंत्र आहे तिच्यात कुणाचेही अनुकरण नाही .तरीपण आरपार जातील अशा सगळ्याच गजला आहेत असे नाही काही .तुरळक गजल मध्ये कारागिरीचा प्रत्यय येतो.मराठी दलित कवितेत छंदोबद्धतेमुळे व समकालिनतेमुळे हा गजलसंग्रह महत्वपूर्ण ठरतो. Tribute to Ghazal singer Ramesh Sarkate