भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
गुहागर, ता. 28 : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील १४ लाख शेतकरी कुटुंबाना दिलासा दिल्याबद्दल उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. Relief to Farmer Families
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना १४ लाख बळीराजांना प्रोत्साहनपर अनुदान
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही महाविकास आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे डॉ.नातू यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या सहा हजार कोटींच्या कर्जाचा बोजा हलका होणार आहे. थेट ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे डॉ विनय नातू यांनी म्हटले आहे. २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यालादेखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्ल डॉ विनय नातू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. Relief to Farmer Families
राज्यातील ब्रह्मगव्हाण, वाघूर आणि भातसा प्रकल्पांसाठी साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर करून कृषी आणि नागरी पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्याच्या निर्णयावरही डॉ.नातू यांनी समाधान व्यक्त केले आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्याच्या थंडावलेल्या प्रगतीला शिंदे-फडणवीस सरकारमुळे वेग येत असल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्याची समस्यामुक्ती आणि शहरी भागाचा विकास यांचा योजनापूर्वक समतोल साधणारी युती सरकारची वाटचाल महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. Relief to Farmer Families