कोकणचा सांस्कृतिक मानबिंदू ,चिपळूणचे वैभव
शिरीष दामले, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सतत काही ना काही घडामोडी होत असतात. मात्र त्यातील आनंदाने दखल घ्यावी, अशा फारच कमी असतात. सर्वसाधारण मनोरंजनापलीकडे जाऊन घडणाऱ्या घडामोडी सर्वच लोकांना आनंद, समाधान देतात. चिपळूण अशा कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असे नामाभिधान सार्थ ठरवणाऱ्या या शहरात रविवारी रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचे होणारे उद्घाटन म्हणजे कोकणी माणसाला अभिमान वाटावा, असा क्षण आहे. संग्रहालय उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, परिश्रम घेतले, त्या साऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे. Rambhau Sathe Museum


लोटिस्माच्या वस्तू संग्रहालयाच्या उभारणीला जलप्रलयातून तावूनसुलाखून निघालेल्या एखाद्या कथेचे साधर्म्य शोधले तर इंद्रायणीतून तरलेले तुकोबारायांचे अभंग आठवतात. इंद्रायणीत बुडालेले अभंग वर आले हे लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते. लोकांच्या हृदयात तुकोबांचे अभंग घर करून असणार आणि मौखिक ताकदीमुळेते पुन्हा जमा झाले असावेत. 2021 च्या महापुरात उद्ध्वस्त झालेले संग्रहालय लोकांच्या मदतीतून पुन्हा उभे राहिले आहे. या मोठ्या ठेव्याची वाताहात झाली होती. साऱ्या दुर्मिळ वस्तू चिखलाने माखलेल्या होत्या. काही चिखलात मिसळून गेल्या होत्या. दस्तावेज तर लगदा स्वरूपात होते. ही वाताहात पाहिल्यावर हताश आणि हतबलपणे तेथे बसलेले प्रकाश देशपांडे आणि त्यांचे सहकारी अश्रू ढाळताना प्रसिद्ध झालेले छायाचित्र कित्येकांना आठवत असेल. तेच देशपांडे आणि संस्थेचे सारे पदाधिकारी, कर्मचारी यांच्यात डोळ्यात आज आनंदाश्रू उभे असतील. Rambhau Sathe Museum
१६० वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह पुरातनवस्तू संग्राहक डॉ. श्रीधर ठाकूर यांची उपस्थिती हा चांगला योग आहे. याची कारणे दोन. उदय सामंत यांच्यासारखा सुसंस्कृत आणि सांस्कृतिक जगात वावरलेला नेता मदतीसाठी लाभला. तर ठाकूर यांची नाळ चिपळूणशी जोडलेली आहे. ते स्वतः पुरातन वस्तूंचे संग्राहक आहेत. चिपळूणची खासीयत अशी की, या शहरात सांस्कृतिक, साहित्यिक क्रीडा क्षेत्रात सतत उपक्रम सुरू असतात. संस्थात्मक उभारणीमध्येही चिपळूण आघाडीवर आहे. त्यामुळेच लोटिस्मासारखी संस्था आणि त्यांच्यातर्फे उभारलेले वस्तू संग्रहालय कोकणचा मानबिंदू ठरतो. चिपळूणमध्ये संस्था उभारणी होत असताना रत्नागिरीत मात्र संस्था कमी आणि पुतळे जास्त अशी अवस्था आहे. रत्नागिरीतील लवकरच दोनशे वर्षे पूर्ण करणारे नगर वाचनालय असे काही अपवाद. (याला भूखंड मिळण्यात मंत्री सामंत यांनी जी भूमिका घेतली, ती रत्नागिरी जिल्ह्याच्या सुसंस्कृत वातावरणाचे फलित आहे.) अशा संस्था या कोकणासाठी मिरवण्याच्या गोष्टी ठरल्या पाहिजेत. Rambhau Sathe Museum


महापुरात संग्रहालयाची अपरिमित हानी झाली. त्यानंतर एकेक वस्तू, दस्तावेज कसे राखले याच्या कथा देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ऐकल्या की या साऱ्यांचे परिश्रम चिकाटी लक्षात येते. या संग्रहालयाला ज्या रामभाऊ साठे यांचे नाव दिले आहे ते शिक्षण महर्षी म्हणवून न घेताही शिक्षण क्षेत्रातील महर्षी होते. लोकसंग्राहक होते. या संग्रहालयाच्या उभारणीस आर्थिक साह्याची गरज आहे. असे आवाहन संस्थेने केल्यानंतर साठे कुटुंबीयांनी घसघशीत देणगीही दिली आहे. सामंत असोत अथवा साठे, अशांच्या उदार वृत्तीमुळे संग्रहालय उभे राहण्यास मदत झाली. याबद्दल कोकणातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे. काही गोष्टींची दखल घेतल्यानंतर आनंद मिळतो किंवा आनंदाने दखल घेता येते, रविवारचा योग हा असा आहे. Rambhau Sathe Museum