मुंबई, ता. 09 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता असून, ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा जोर कमी होणार आहे. हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खंड २० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे. Rain break
अफगाणिस्तानकडून वाहणारे कोरडे वारे गुजरातच्या दिशेने सरकत असून, ते कोकण व उर्वरित महाराष्ट्रावर घोंघावणार आहेत. या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता कमी होईल. प्रशांत महासागरात तयार झालेल्या ‘एल निनो’चा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. या दोन्ही घटकांमुळे अरबी समुद्रासह कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राच्या इतर भागांत मान्सूनचे ढग तयार होण्यास बाधा निर्माण झाली आहे. Rain break

ढगच तयार होणार नसल्याने पावसाची सक्रियता कमी होईल. ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा वेग कमी होईल. पाऊस पूर्णपणे गायब होणार नाही. अधून-मधून पावसाच्या एक-दोन मोठ्या सरी नक्कीच कोसळतील; मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात जसा मुसळधार पाऊस झाला, तसा प्रभाव व वेग आता बघायला मिळणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार २० जुलैपर्यंत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यानंतर हवामानात जे बदल होतील, त्यानुसारच मान्सूनच्या पुढील सक्रियतेची दिशा ठरेल. Rain break
