मंत्री रविंद्र चव्हाण, अनेक योजना येवून पाणी प्रश्र्न सुटला नाही
गुहागर, ता. 20 : जलजीवन मिशनच्या कामावर ग्रामस्थ, पाणी कमिटीचे सदस्य आणि पत्रकारांनी लक्ष ठेवावे. या योजनेद्वारे स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. आजपर्यंत देशाने अशा अनेक योजना पाण्यासाठी राबवल्या आहेत. त्या यशस्वी झाल्या नाहीत. आता ही योजना सर्वांनी मिळून यशस्वी करु या. असे आवाहन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते गुहागरमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलत होते. Program of Journalist Union in Guhagar


गुहागर तालुका पत्रकार संघाच्या पालखी नृत्य स्पर्धा उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळ्याला मंत्री रविंद्र चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, नरेंद्र मोदींसारखे नेतृत्त्व देशाला लाभल्यानंतर त्यांनी जे बदल केले त्यामुळेच प्रत्येक घरात वीज, गॅस पोचला. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळजोडणीद्वारे पाणी मिळावे म्हणून अनेक योजना आल्या. मात्र या योजना विविध कारणांनी असफल झाल्या. मी कोणत्याही सरकारला दोषी ठरवणार नाही परंतु पैशांचे नियोजन हे त्यातील मुख्य कारण आहे. आता जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ही योजना सफल करुन देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र या योजनेची यशस्वीता गावागावातील पाणी समित्या आणि ग्रामस्थांवर अवलंबुन आहे. त्यांनी आपल्या गावाच्या पाणी योजनेत स्वत: लक्ष घालावे. जलजीवन मिशनच्या निधीचे योग्य नियोजन होत आहे ना, माझ्या पुढच्या पिढीला स्वच्छ पाणी मिळणार आहे ना हे तपासून घ्यावे. पत्रकारांनाही विनंती आहे की त्यांनी जलजीवनच्या कामावर लक्ष ठेवावे. गावागावातील योजनांचे काम योग्य पध्दतीने सुरु आहे ना, पारदर्शकता आहे की नाही हे तपासावे. अयोग्य गोष्टी निर्भिडपणे वृत्तपत्रातून सरकारपर्यंत पोचवाव्यात. Program of Journalist Union in Guhagar
सांस्कृतिक विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात होणारे नमन आणि पालखी नृत्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात केले जावेत यासाठी सुधीरभाऊंना मी नक्की साकडं घालेन. हे सरकार जनमानसाच्या मनात काय आहे याचा विचार करणारे आहे. कोकणातील असलेल्या कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून काम उभे राहीले पाहिजे. या विषयाला सरकारद्वारे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करेन. असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. Program of Journalist Union in Guhagar