महाराष्ट्रात ६ जूनला पोहोचणार
मुंबई, ता. 16 : राज्यात उन्हाचा कडाका असह्य झाला असतानाच हवामान विभागाने एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असून मान्सूनच्या आगमनाची अधिकृत चाहूल लागली आहे. 16 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अंदमान-निकोबार बेटांवर धडकण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि हिंद महासागराच्या परिसरात ढगांची दाटी वाढली असून मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. Monsoon likely to hit Andaman today
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनचा प्रवास विनाअडथळा आणि वेळेत पार पडण्याची चिन्हे आहेत. अंदमानात वेळेपूर्वी दाखल झाल्यानंतर मोसमी वारे केरळच्या दिशेने कूच करतील. केरळमध्ये 31 मे च्या सुमारास पावसाचे आगमन अपेक्षित असून त्यानंतर 6 जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनच्या मार्गात कोणतेही चक्रीवादळ अडथळा ठरण्याची शक्यता नसल्याने पाऊस नियोजित वेळेवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सामान्यतः मान्सून अंदमानात 20 मे च्या आसपास दाखल होतो, मात्र यंदा अनुकूल परिस्थितीमुळे तो तब्बल 5 ते 6 दिवस आधीच म्हणजेच 16 मे पर्यंत तिथे पोहोचू शकतो. Monsoon likely to hit Andaman today
दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पुढील 24 तासांत पाऊस सुरू होईल. या प्रगतीमुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्येही पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने वर्तवलेला उष्णतेचा अंदाज खरा ठरला असून राज्याच्या अनेक भागात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मात्र, मान्सून वेळेवर किंवा त्याआधीच येण्याच्या वृत्तामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अंदमानातील आगमनानंतर केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रवास सुरू होईल. यामुळे लवकरच उन्हाळ्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. Monsoon likely to hit Andaman today
