रत्नागिरी मतीमंद मुलांचा पालक संघ या संस्थेला गगनाला पंख नवे पुरस्कार
रत्नागिरी, ता. 24 : येथील मतिमंद मुलांच्या निवासी स्वयंरोजगार प्रकल्प असलेल्या आशादीप मतीमंद मुलांचा पालक संघ या संस्थेला राज्यस्तरावरचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मिती एंटरटेन्मेंटचा गगनाला पंख नवे हा राज्यस्तरीय पुरस्कार आशादीपचे संस्थापक दिलीप रेडकर यांनी मिती आयोगाच्या व्यवस्थापकीय संचालक, संस्थापक सौ. उत्तरा मोने, अॅड. सौ. शिंदे, वर्षा पवार-तावडे यांच्या हस्ते मुंबईत स्वीकारला. Miti Entertainment’s State Award
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या कलांगणात हा कार्यक्रम झाला. २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच आशादीपच्या कार्याची दखल नवनीत फाउंडेशनने आशादीप संस्थेला २१ हजार रुपयांची मदत दिली. आपल्या अपंगत्वावर मात करून आकाशाला गवसणी घालणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि अशा व्यक्तींचा आधार बनू पाहणाऱ्या संस्थांना मिती एंटरटेन्मेंटतर्फे गेली ७ वर्षे हे पुरस्कार देण्यात येत आहे. यंदा १५० प्रस्तावांमधून आशादीप संस्थेची निवड करण्यात आली. या निवड समितीमध्ये मुंबई विद्यापीठाच्या डॉ. सौ. स्नेहलता देशमुख, विजय कुवळेकर, श्रीरंग गोडबोले, वर्षा पवार-तावडे, प्रसाद कांबळी यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश होता. Miti Entertainment’s State Award
कार्यक्रमात विकास विद्यालयाच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. कॅप्टन राहुल रामुगडेसह मुंबई व्हिलचेअर क्रिकेट टीमचा विशेष सन्मान करण्यात आला. निसर्गाने दिलेल्या आव्हानांवर मात करत यशस्वी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीमत्व व संस्थांना या वेळी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान योगिता चितळे, दत्तात्रय मेस्त्री यांनी गायन केले. दीप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले. Miti Entertainment’s State Award

आशादीप संस्थेविषयी
आशादीप संस्थेची स्थापना सन २००० मध्ये करण्यात आली. आशादीप ही संस्था रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागातली एकमेव पालक संस्था आणि वसतिगृह आहे. संस्थेच्या कामकाजाला २००५ मध्ये प्रत्यक्ष सुरवात झाली. मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी संस्थेची स्थापना झाली. संस्थेत ११ कर्मचारी काम करत आहेत. १० ते ५६ वयोगटातली २८ मतिमंद मुलं संस्थेत आहेत. मुलांना काहीतरी काम मिळावं या उद्धेशाने संस्थेने स्वयंरोजगार केंद्रही सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदी फुले, पणत्या, शोभेच्या वस्तू, केरसुण्या बनवून विकल्या जातात. या विक्रीतून मिळालेलं उत्पन्न संस्था या मतीमंद मुलांच्या नावे असलेल्या खात्यात जमा करते आणि कर्मचाऱ्यांना मानधन देते. गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी आणि कोकणातील मुलं संस्थेत राहायला येतात. १० मुलं आविष्कार या विशेष शाळेत जातात आणि बाकी उरलेले संस्थेमध्येच राहतात. या संस्थेला २०१६ मध्ये कोकण भूषण पुरस्कार प्राप्त झाला. कोविड १९ या कालावधीत सगळी वाहन बंद असल्यामुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना लांबून येणं शक्य नसल्याने ४ कर्मचारी दिवसरात्र संस्थेत राहून त्यांनी उत्तमरीत्या काळजी घेतली. Miti Entertainment’s State Award

