१० महसुली गावांनी योजना नाकारली ; ९० गावांचे अंदाजपत्रक सादर
गुहागर, ता. 21 : शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेसाठी गुहागर तालुक्यातील एकूण ११९ पैकी सुमारे ९० गावांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. यामध्ये ७६ महसुली गावांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. मुबलक पाणी असलेल्या १० महसुली गावांनी ही योजना नाकारल्याची माहिती गुहागर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. Jaljeevan Mission Plan


शासनाची ‘जलजीवन मिशन पाणी योजना’ ही महत्वाकांक्षी योजना आहे. गावातील प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकापर्यंत २०२४ पर्यंत पाणी देण्याची केंद्र व राज्य सरकार यांची एकत्रित योजना असून यासाठी भरपूर प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. गुहागर तालुक्यात एकूण ११९ महसुली गावे आहेत. यापैकी ९० गावांची अंदाजपत्रके सादर करण्यात येऊन एकूण ७६ गावांना तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. ज्या गावांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे अशा दहा गावांनी ही योजना नाकारली आहे. मात्र, जी गरजू गावे आहेत त्यांच्याकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Jaljeevan Mission Plan


या योजनेतंर्गत आतापर्यंत ३० कामांचा आदेश प्राप्त झाला आहे. निधीही उपलब्ध झालेला आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात या योजना राबविण्यात गती मिळणार असल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता आहे. दरवर्षी गुहागर तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाई भासते. टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या योजनेमुळे घरोघरी नळाद्वारे पाणी जाणार असल्याने पाणीटंचाईवर मात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलजीवन मिशन योजना तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. Jaljeevan Mission Plan