माजी सरपंच यशवंत बाईत व ग्रामस्थांची मागणी
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील अंजनवेल गावातील मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी राबविण्यात येत असलेली कोटयावधी रूपयाच्या जलजीवन योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत अधिकारी यांना निदर्शनात आणून देऊनही कोणतीच कार्यवाही होत नाही. यामुळे सदर योजना ही जनतेसाठी नसून शासकीय अधिकारी व ठेकेदारासाठी राबविली जात आहे. या योजनेची स्पेशल स्कॉडमार्फत सखोल चौकशी व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी सरपंच यशवंत बाईत व ग्रामस्थांनी केली आहे. Inquiry regarding Jaljeevan Yojana
तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये सलग दोन वेळा यशस्वीपणे सरपंच पद भूषवणारे यशवंत बाईत यांनी आपल्या गावातील विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथील जलजीवन योजनेतील अनंत त्रुटी व त्याच्या दुरुस्तीबाबत शासकीय अधिकारी यांना कळवूनही कोणतीच कार्यवाही होत नाही. शेवटी या योजनेबाबत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा या योजनेतील सत्य सर्वांसमोर ठेवले आहे. मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेल अशा दोन योजना राबवीण्यात आल्या. पहिली पेठ अंजनवेलसाठी ५५ लाख १५ लाख १७० एवढया अंदाजपत्रकाची जलजीवन योजना राबवीली. यामध्ये भूसर्वेक्षण यांनी दिलेल्या जागेवर विहीर न घेता अर्धी नदी पात्रात ५० टक्के विहीरीचे खोदकाम केले. परंतु पाणीच लागले नाही. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी विहीर चुकीची ठरल्याने पुन्हा येथील योजनेचे पुर्नयोजना करून सुमारे १ कोटी १८ लाख २७ हजार २८२ रूपयाची योजना बनविली. ही योजना करताना शासकीय कामकाजाची पूर्णपणे मोडतोड केली. Inquiry regarding Jaljeevan Yojana
दुसरी मौजे अंजनवेलसाठीची जलजीवन योजना ८५ लाख ८३ हजार ३९८ रूपयाची तयार करण्यात आली. यामध्ये ज्या विहीरीचे पाणी मार्च महिन्यापासून आटावयास सुरूवात होते. त्या विहीरीत मुबलक पाणी साठा असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे योजनेवर खर्च करायचा आणि योजना सुरू झाली की विहीर न घेतल्याने योजनाच बाद ठरवायची असा डाव आखला जात आहे. यातून येथील जनतेला नियमित पाणी मिळणार नाही. शासकीय निधी असला तरी तो योग्य ठिकाणी खर्ची पाडला पाहीजे. याबाबत आपण डीसेंबर २०२२ पासून येथील गटविकास अधिकारी, ग्रामिण पाणी पुरवठा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करून असलेल्या त्रुटी दाखवून त्या दुरूस्त करण्याचीही मागणी केली आहे. मात्र यावर कोणतीच कार्यवाही नाही. शेवटी २६ जानेवारी रोजी उपोषणाचे निवेदन दिल्यावर दोन वेळा संबधीत अधिकारी व गुहागर तहसिलदार यांच्या दालनामध्ये बठका झाल्या. त्या बैठकीमध्ये अधिकारी वर्गाने योजनेतील असंख्य त्रुटी मान्य केल्या व त्याची दुरूस्तीही करण्याचे ठरवीले. परंतु त्यानंतर कोणतीच कार्यवाही नाही. यामुळे सदर योजना ही जनतेसाठी नाही तर अधिकारी व ठेकेदारासाठी असल्याचा आरोप केला. या योजनेची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. यावेळी योजनेतील संबधीत कागदपत्रही पत्रकांसमोर ठेवले. Inquiry regarding Jaljeevan Yojana