जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी?
गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प प्रमाणातच कमी झाला आहे ही वस्तूस्थिती. सध्या भारतीय लष्कराकडून या संवेदनशील भागात अतिदक्षता पाळली जात असताना एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत मिळत आहेत. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील एका गावात काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींमुळे संरक्षण यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. India Pakistan Tension


संरक्षण यंत्रणांच्या माहितीनुसार एका स्थानिक महिलेनं पोलिसांना घडला प्रकार सांगितला, जिथं तिनं सैन्याच्या वर्दीत काही संशयास्पद व्यक्तिंना पाहिलं. या दोन व्यक्ती तिच्या घरी आल्या, दार ठोठावलं आणि तिच्याकडे पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर आपण कॅम्पला माघारी जात आहोत असं ते म्हणाले आणि तिथून निघून गेले. या व्यक्तींच्या सर्वच हालचाली महिलेला संशयास्पद वाटल्याचं लक्षात येताच तिनं तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. सदर घटनेनंतर घघवाल आणि नजीकच्या भागांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीनं त्याची माहिती संरक्षण यंत्रणांन द्यावी असं आवाहन करण्यात आलं. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या बळावर तातडीनं या भागात शोधमोहिम आणि इतर कारवाई हाती घेतली मात्र संशयितांची ओळख अद्यापही पटलेली नाही. ज्यामुळं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, या पार्श्वभूमीवर कठुआ भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असून या भागातील घराघरासह वन क्षेत्र पिंजून संशयितांचा शोध घेतला जात आहे. India Pakistan Tension

