स्वतःशी खोटं बोलू नका
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
आपण लहानपणापासून हे शिकत आलो आहोत की खोटं कधी बोलू नये. किंबहुना आपण देखील आपल्या मुलांना तेच सांगत आलो आहोत. तुमच्या आई-वडिलांनी देखील तुम्हाला तेच सांगितलं असेल. पण तरीही आपण कळत नकळपणे खोटं बोलत असतो.
मित्रांनो, आज मी तुम्हाला एवढेच सांगणार आहे की स्वतःशी खोटं बोलू नका.
बघा काय होत असतं, आपण अनेक संकल्प करत असतो. सकाळी लवकर उठण्याचा, दररोज जॉगिंग करण्याचा, योगा करण्याचा, मेडिटेशन करण्याचा, चहा न पिण्याचा, तंबाखू न खाण्याचा, वगैरे… असे अनेक संकल्प आपण करत असतो.
आपण बऱ्याच वेळा ते इतरांना देखील सांगत असतो, डिक्लेअर करत असतो. आपण एखादी गोष्ट इतरांना सांगितली की आपण ती हमखास करतोच असा आपला समज असतो आणि यासाठीच ती डिक्लेअर करत असतो. तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट डिक्लेअर करता, त्यावेळी तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तुम्हाला पुन्हा त्या गोष्टीबद्दल विचारत असतात.
पहिले काही दिवस आपण ती गोष्ट करतो देखील, परंतु काही दिवसानंतर ती गोष्ट आपण करायची सोडून देतो. आणि त्यानंतर जर तुमच्या मित्राने, मैत्रिणीने, नातेवाईकांनी त्या गोष्टीबद्दल विचारले तरी देखील आपण ती गोष्ट करतोच असे ठामपणे सांगत असतो.
खरंतर आपण ती गोष्ट सोडून देऊन बरेच दिवस झालेले असतात, तरी देखील आपण त्यांच्याशी खोटं बोलत असतो. त्यामुळे त्यांना बरं वाटो किंवा न वाटो, तुम्हाला बरं वाटतं.
पण यात एक गोष्ट होते की तुमच्या मनाला खोटं बोलायची नकळतपणे सवय लागते. याचा परिणाम असा होतो की तुमचा मेंदू ती गोष्ट करायला प्रवृत्त होत नाही. कारण दररोज तीच वाक्य बोलून बोलून त्याला सवय झालेली असते.
पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी खोटं बोलता, त्यावेळी तुम्ही अस्वस्थ होता, “उगीच खोटं बोललो” असे तुम्हाला वाटतं. परंतु वारंवार तुम्ही अशा प्रकारची वाक्य बोलल्यामुळे तुमचा मेंदू त्या गोष्टी चा स्वीकार करतो.
मित्रांनो, याचा तोटा तुम्हालाच होत असतो. तुम्ही दुसऱ्यांना सांगता की “मी दररोज मेडिटेशन करतो”, पण तुम्ही करत नसता. त्यामुळे मेडिटेशनचा जो इच्छित परिणाम व्हायला हवा तो होत नाही.
तुम्ही सांगता की “मी दररोज सकाळी फिरायला जाते, जॉगिंग करते”, आणि तुम्ही प्रत्यक्ष ती कृती करत नसता. अशावेळी सकाळी उठून चालण्याचे, जॉगिंग करण्याचे फायदे तुम्हाला होत नाहीत.
तुम्ही सांगता “मी दररोज अभ्यास करतो”, परंतु तुम्ही अभ्यास करत नसता, त्यामुळे त्याचा परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो.
तुम्ही इतरांना सांगत असता मी आता मोबाईल जास्त बघत नाही. व्हाट्सअप बघत नाही. परंतु तुम्ही ते सर्व करत असता. अशावेळी तुमचे महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष झालेले असते व घरातील कामे वेळेवर न झाल्यामुळे घरामध्ये देखील चिडचिड होत असते, याचा तोटा तुम्हालाच होत असतो.
मित्रांनो तुम्ही जे काही ठरवता ते तुमच्यासाठी असतं. ते इतरांना सांगण्यासाठी नसतं. त्यामुळे इतरांना चांगलं वाटण्यासाठी खोटं बोलू नका आणि तुम्ही किती खोटं बोलला तरी प्रत्येकाला कळायचे ते कळतच. उलट तुम्ही नेहमी खोटं बोलताय हे लोकांना कळाल्यावर तुमच्याबद्दलचा आदर कमी होत असतो.
त्यामुळे कमीत कमी स्वतःशी तरी खोटं बोलू नका. तुम्ही इतरांना फसवू शकता, पण स्वतःला नाही. त्यामुळे आज पासून चांगले विचार करा, चांगले संकल्प करा व त्यावर कृती करा म्हणजे खोटं बोलण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -16 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद,
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद