मोबाईल रिस्टार्ट करा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
आपण सर्वजण मोबाईल वापरतो. त्या मोबाईल मध्ये फोटो काढतो, गाणी ऐकतो, व्हाट्सअप मेसेज पाठवतो, रेकॉर्डिंग करतो व अनेक प्रकारचे ॲप आपण त्यात चालवतो. मोबाईल आपल्याला किती उपयोगी असतो. मोबाईल शिवाय आज कोणतेही काम होत नाही. प्रत्येकाला सतत त्याच्याजवळ मोबाईल हवा असतो. नुसता मोबाईल नाही, तर चार्जर देखील हवा असतो. तुमच्याकडे मोबाईल आहे, परंतु मोबाईल ची बॅटरी चार्ज नाही, तर किती त्रास होतो. म्हणजे मोबाईल चांगल्या स्थितीत असला पाहिजे, त्याची बॅटरी चार्ज असली पाहिजे, आणि महत्वाचे म्हणजे त्याला रेंज पाहिजे. तरच तो मोबाईल आपल्या कामाचा असतो.
कधीकधी तो मोबाईल हँग होतो. मग आपण त्याला स्विच ऑफ करतो. रिस्टार्ट करतो. तो पुन्हा चांगल्या प्रकारे काम करू लागतो. परंतु काही वेळेला आपल्याला मेसेज येतो की यातील काही फाईल्स डिलीट करा. मग त्यावेळी आपण काही फाइल्स डिलीट करतो.. मोबाईल मध्ये थोडी स्पेस निर्माण झाली की, तो मोबाईल चांगल्या प्रकारे काम करू लागतो. फाइल्स डिलीट करताना आपण प्रायोरिटी प्रमाणे त्यांना डिलीट करत असतो. सर्वात कमी महत्त्वाची पीडीएफ, जुने फोटो, फॉरवर्डेड व्हिडिओज, गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज आपण पहिल्यांदा डिलीट करतो. आपण आपल्या कुटुंबाचे, आपल्या मित्राचे, मैत्रिणीचे फोटो किंवा व्हिडिओ जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
मित्रांनो आपले जीवन देखील या मोबाईल सारखेच आहे. प्रत्येकाचे एक शेड्युल ठरलेले असते. सकाळी लवकर उठा, घर आवरा, स्वयंपाक करा, कामाला जा, मुलांना शाळेत सोडा, घरातील इतर मंडळींची काळजी घ्या. हे सर्व चालू असताना मध्येच काही टेन्शन असतात. कोणाचे आजारपण असते. लोन चे हप्ते भरता भरता नाकी नऊ आलेले असते. घरामध्ये मानापमान नाट्य चालू असते. शाळेत जाणाऱ्या मुलांची अभ्यासाची काळजी असते. कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींचे अजून वेगळेच टेन्शन असते. भरपूर प्रश्न असतात. आणि एक वेळ अशी येते की आपण सुद्धा हँग होऊन जातो. काहीच करायला नको वाटते. कुणाशी बोलायला नको वाटते. कोणत्याही कामांमध्ये रस राहत नाही. कधी कधी वाटते कुठेतरी लांब पळून जावे. कधी कधी अजून जास्त निगेटिव्ह विचार येतात. समोर कोणतं सोल्युशन दिसत नाही. अशावेळी काय करायचे, असा प्रश्न पडतो?
मित्रांनो एकदम सोप्पं आहे. तुमचा मोबाईल हँग झाल्यावर तुम्ही जे करता, तेच तुमच्या बाबतीत करा. थोडा पॉज घ्या. स्वतःला रिस्टार्ट करा. नको असलेल्या, जुन्या नकारात्मक आठवणी काढून टाका. नकारात्मक लोकांच्या पासून दूर राहा. कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा. स्वतःला वेळ द्या. दररोज 15 ते 30 मिनिटे एकांतात घालवा. तुम्हाला जे आवडते ते करा.. मोठ्याने गाणी म्हणा, शांत संगीत ऐका, डान्स करा. निसर्गात जा, नद्या नाले, फुले पाने, डोंगर, समुद्र लाटा, पक्षी सर्वांचं निरीक्षण करा. निसर्गातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवत असते.
निसर्गात गेल्यामुळे, तुम्हाला आनंद देणारी कृती केल्यामुळे तुम्ही रिजुवनेट होत असता. तुम्हाला पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटतं. तुमचा मोबाईल रिस्टार्ट झालेला असेल.आणि हो तुमचा चार्जर म्हणजेच तुमची स्वप्ने. तुमची स्वप्नेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करत असतात. प्रेरणा देत असतात, तुम्हाला चार्ज करत असतात. त्यामुळे चार्जर नेहमी बरोबर ठेवा.आणि हो नेहमी आपल्या लोकांच्या , मित्रांच्या रेंजमध्ये रहा. मग बघा तुमचा मोबाईल कसं काम करतोय ते. तुम्ही पुन्हा तसेच आनंदी, उत्साही, तरुण कार्यक्षम फील कराल.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -13 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा