नातेसंबंध चांगले ठेवा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो, प्रत्येक माणसाला अनेक समस्या असतात. कुणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, पगार पुरेसा नाही, तर कोणाचे आरोग्याचे प्रश्न चालू आहेत. काहीतरी दुखणं चालू आहे. काहींना त्यांच्या मुलांचे प्रश्न सतावत आहेत. मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांना मार्क्स कमी मिळतायंत. नोकरीमध्ये प्रमोशन नाही, तुमचे सहकारी तुमच्याशी चांगले वागत नाहीत. तुमचं/ तुमच्या मुलांचं लग्न जमत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, वगैरे… असे अनेक प्रश्न आज प्रत्येकाला पडलेले असतात. पण जर आपण बारकाईने विचार केला. तर या खऱ्या समस्या नाहीत. खरी समस्या ही आहे की तुमचे नातेसंबंध चांगले नाहीत. तुम्ही एकमेकांशी नीट बोलत नाही, एकमेकांना समजून घेत नाही
उदाहरणार्थ-
तुम्ही आजारी पडला की प्रथम तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला काही औषधे देतात व त्या औषधांनी तुम्ही बरे होता. काही वेळेला तुम्हाला काही टेस्ट करायला सांगितल्या जातात. काही वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागते. काही वेळेला तुम्हाला ऑपरेशन देखील करावं लागतं. मित्रांनो तुम्ही आजारी पडला किंवा तुमचा पैसा खर्च झाला. ही खरं पाहिलं तर मोठी समस्या नाहीये. या आजारपणामध्ये तुमचा नवरा, बायको, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, तुमची मुलं जे काही तुम्हाला बोलतात, ज्या पद्धतीने तुमच्याशी वागतात याचाच खूप त्रास होत असतो. म्हणजे या ठिकाणी तुमचे नातेसंबंध चांगले नाहीत, समजून घेणारी माणसं नाहीत याचा आपल्याला त्रास होतो. तुम्ही कसे चूक आहात, तुम्ही कसे स्वतःची काळजी घेत नाही आणि कसं त्यांचं ऐकत नाही हे ते वारंवार सांगत असतात. मित्रांनो यावेळी खरी गरज असते मानसिक आधाराची, चांगल्या शब्दांची..
परंतु तुमच्या नातेसंबंधात तेवढी प्रगल्भता नसल्यामुळे, तुम्हाला अशी वागणूक मिळत असते आणि त्या आजारपणापेक्षा याच गोष्टीचा जास्त त्रास होत असतो.
तुम्हाला पगार कमी आहे. तेवढ्या पैशात तुमचं भागत नाही. मित्रांनो, हा पण मोठा प्रश्न नाहीये. तुमच्या घरात पैसा नसताना, आर्थिक प्रश्न उभा असताना तुमच्याशी घरातले जे वागतात त्याचा त्रास जास्त होतो. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो देखील, ‘फक्त तुझी मला साथ हवी, परिस्थिती काय उद्या बदलेल ही! ‘
तुमचे जोडीदाराशी, मुलांशी, आई-वडिलांशी नातेसंबंध चांगले हवेत, त्यांनी तुम्हाला या वाईट काळात वाईट बोलू नये, तुमचा अपमान करू नये ही तुमची अपेक्षा असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा, तुमच्या जोडीदाराचा मानसिक आधार, मोरल सपोर्ट हवा असतो. त्यामुळे पैशापेक्षा तुमचे नातेसंबंध चांगले नाहीत हीच मोठी समस्या असते.
तुमच्या मुलाला मार्क्स कमी मिळाले ही खरी समस्या नसते. मार्क्स कमी मिळाल्यावर ज्या पद्धतीने तुमचा जोडीदार, नातेवाईक किंवा मुले देखील तुम्हाला जबाबदार धरतात, त्यावेळी वाईट वाटते. त्याला कमी मार्क मिळाले ही समस्या नसून हे लोक त्याला योग्य मार्गदर्शन करत नाहीत, तुमच्याशी योग्य पद्धतीने बोलत नाहीत, त्या मुलाला विश्वासात घेऊन चर्चा करत नाहीत व एकमेकांना दोष देतात, ही खरी समस्या असते. एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळू शकतात, पुढे भविष्यामध्ये ते मार्क वाढू देखील शकतात, याची जाणीव हवी. मित्रांनो अशा अनेक घटना तुम्हाला आठवतील. परंतु नेहमीच असं होतं असं नाही.
तुम्हाला असे देखील प्रसंग आठवतील तुमच्याकडे पैशाचा खूप प्रॉब्लेम चालला होता, त्यावेळी तुमच्या जोडीदाराने केलेली ऍडजेस्टमेंट, तुम्ही कधीतरी आजारी होता, त्यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाने दिलेली साथ, कधीतरी तुम्हाला खूप टेन्शन आलं होतं, काही प्रश्न पडले होते. आता कसं व्हायचं या चिंतेत तुम्ही होता, परंतु त्याचवेळी कुटुंबातील हीच मंडळी तुमचा हात हातात घेऊन सांगत होती, ‘काही काळजी करू नका. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत’. त्यावेळी तुम्हाला वाटलं असेल की माझी फॅमिली जर माझ्यासोबत आहे, तर टेन्शन कशाला घ्यायचं? आणि तुम्ही त्या प्रसंगातून देखील धिरोदात्तपणे बाहेर पडला असाल
काही प्रसंगात तर तुम्हाला वाटलं असेल की आता जीवनात काही मजा नाही, आता कुठेतरी थांबावं. आणि आपलं जीवन संपवून टाकावं आणि अशा वेळी तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा एक कॉल ‘मी येईपर्यंत थांब, कोणतही टोकाचे पाऊल उचलू नकोस. सर्व ठीक होईल.’ मित्रांनो, हे शब्द तुम्हाला त्यावेळी खूप दिलासादायक वाटले असतील आणि तुम्ही पुन्हा त्या नकारात्मक गोष्टीतून बाहेर पडला असाल
मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार नेहमीच येत असतात, त्या प्रत्येक प्रसंगात तुमच्या कामी येतात ते तुमचे नातेसंबंध. म्हणून नातेसंबंध चांगले ठेवण्याकडे लक्ष द्या. कधी कधी एकमेकांना समजावण्यापेक्षा समजून घेणे खूप महत्त्वाचे असते, तसा प्रयत्न करा.
मित्रांनो ज्या घरामध्ये नातेसंबंध चांगले असतात, एकमेकांना समजून घेतले जाते, त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तुमच्या व्यक्तिगत, कौटुंबिक, शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुमची प्रगतीच होत असते
नातेसंबंध चांगले सुदृढ ठेवण्यासाठी या विषयावरमी नंतर बोलेन.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -11 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा