रत्नागिरी, ता. 27 : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळ्याचे औचित्य साधून कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेतर्फे तीन दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. नाचणे-संभाजीनगर येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात गीतरामायणाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. Geetramayana by Kuvarbav Brahmin Panchkroshi

पहिल्या दिवशी प्रा. अंजली बर्वे यांचे ‘नित्य स्मरावा राम’ या विषयावर प्रवचन झाले. कीर्तनकार हभप कुमार भाट्ये यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यामध्ये त्यांनी रामभक्त वेणास्वामींचे चरित्र कथन केले. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या मुख्य दिवशी सोमवारी सायंकाळी रत्नागिरीतील सप्तसूर मुझिकल प्रस्तुत गीतरामायणातील निवडक गीतांची सुरेल मैफल रंगली. यामध्ये प्राची रानडे, नरेंद्र रानडे, प्रा. सुहास सोहनी यांनी गायन केले तर त्यांना निरंजन गोडबोले, संतोष आठवले यांनी संवादिनी, मंगेश मोरे यांनी सिंथेसायझर, उदय गोखले यांनी व्हायोलिन, निखिल रानडे यांनी तबला तर प्रा. सुहास सोहनी यांनी तालवाद्याची साथ केली. वामन जोग यांनी निवेदनातून रामकथा रसिकांसमोर मांडली. पांडुरंग बर्वे यांनी ध्वनीसंयोजन केले. Geetramayana by Kuvarbav Brahmin Panchkroshi
या कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या बालचमूंनी राम, सीता, हनुमान, उर्मिला यांची वेशभूषा करून प्रवेश केला आणि सभागृहात श्रीरामाचा जयघोष झाला. आयोजकांतर्फे या बालकलाकारांचे सन्मान करण्यात आला. आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. Geetramayana by Kuvarbav Brahmin Panchkroshi
