कोकणकन्या, नेत्रावती, तुतारीची तिकिटे संपली; प्रतीक्षा यादीची मर्यादा गाठली
मुंबई, ता. 18 : गणेशोत्सवाला अद्याप दोन महिने असतानाच, कोकण रेल्वेच्या आरक्षणासाठी मोठी गर्दी झाली आहे. रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू होताच, तीन मिनिटांत ‘रिग्रेट’ असा संदेश येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यंदा गणेश चतुर्थी सोमवारी १४ सप्टेंबर रोजी आहे. गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी एक ते दोन दिवस आधी शहरातीलकोकणवासी कोकणात दाखल होतो. यंदा नेमका शनिवार-रविवार आहे. त्यामुळे नोकरदारांकडून अधिकच्या सुट्टया न घेता शनिवार-रविवार सुट्ट्याच्या दिवशी गावी जाण्याचे नियोजन सुरू आहे. Ganeshotsav bookings ‘full’
परिणामी १२, १३ आणि १४ सप्टेंबर रोजी दादर-रत्नागिरी मार्गावरील प्रमुखएक्स्प्रेस गाड्यांमधील आरक्षण पूर्ण झाले आहे. गाडी क्रमांक २२११९ तेजस एक्स्प्रेस (१२०५१) जनशताब्दी, (१२६१९) मत्स्यगंधा, (२०६१९) कोकणकन्या, (१६३४५) नेत्रावती आणि (११००३) तुतारी एक्स्प्रेस अशा लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये नियमित तिकिटांसह प्रतीक्षा यादीची मर्यादा ही संपली आहे. त्यामुळे तिकीट आरक्षण करण्यासाठी लगबग करणाऱ्यांच्या मोबाइलवर ‘रिग्रेट’ असा संदेश झळकत आहे. आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत तिकीटविक्री बंद झाल्याने समाजमाध्यमांवर प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. सकाळी आठ वाजता आरक्षण सुरू होते आणि आठ वाजून तीन मिनिटांनी तिकीट विक्री बंद होते. त्यामुळे तिकीट मिळणे हे नियोजनापेक्षा नशिबावरच अधिक अवलंबून असल्याची भावना व्यक्त होत आहे. कायमस्वरूपी क्षमतावाढ व्हावी गणेशोत्सवापूर्वी ‘कोकणकन्या रिग्रेट महोत्सव’ सुरू होणे हे आता वार्षिक वास्तव झाले आहे. Ganeshotsav bookings ‘full’
दरवर्षी प्रचंड प्रवासी मागणी असूनही अतिरिक्त गाड्या किंवा कायमस्वरूपी क्षमता वाढविण्याबाबत ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे आता विशेष गाड्यांच्या घोषणेकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे, असे कोकण रेल्वेचे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले. ‘दलालांवर कारवाई करा’ गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या प्रवासासाठी आरक्षण सुरू होताच शेकडोची प्रतीक्षायादी, रिग्रेटचे संदेश येत असल्याच्या तक्रारी सातत्याने रेल्वे मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनधिकृत तिकीट दलालांविरोधात विशेष मोहीम राबवून अनेक ‘आयआरसीटीसी’ आयडी जप्त केले होते. यंदाही अशाच धडक कारवाया करून सामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा. विशेष रेल्वेगाड्या आणि विनाआरक्षित रेल्वेगाड्यांची घोषणा ही लवकर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. Ganeshotsav bookings ‘full’
