लेखक : अरूण परचुरे (सर)
गजानन नाट्य समाज, देवपाट – गुहागर या नाट्यसंस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. सुवर्ण महोत्सव व शतकपूर्ती महोत्सव हे दोन्ही उत्सव याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मला मिळाले. एखादी नाट्य संस्था स्थापन होते व १०० वर्षे सातत्याने रंगभूमीची सेवा करते, हे किती गौरवास्पद व कौतुकास्पद !! Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar


गुहागर हे कलाप्रेमी, नाट्यप्रेमी, उत्सव प्रिय लोकांचे गाव. गुढीपाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक उत्सवात, कार्यक्रमात, उत्साहाने सर्व लोक भाग घेत असतात. उत्सवाचे नाटक म्हणजे एक आनंद सोहळा ! त्यासाठी होणारी सभा, नाटकाची निवड, त्यातील पात्रांची निवड, नाटकाच्या तालमी, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाश योजना यासाठी करावी लागणारी धडपड, मेहनत… सारे काही अविस्मरणीय ! हे ज्यांनी अनुभवले आहे त्यांना शंभर वर्षे नाट्य संस्थेला पूर्ण झाल्याचा परमानंद झाल्याशिवाय राहणार नाही. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar
गजानन नाट्य समाज या नाट्यसंस्थेची स्थापना करणारे व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने स्मरण करूया व त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करूया. १९७१ साली पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने स्मरणिकेच्या माध्यमातून पहिल्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यात आला. तेव्हाच्या आठवणींना उजाळाही मिळाला. नंतरची पन्नास वर्षे १९७१ ते २०२२ आम्ही पाहिलेली व अनुभवलेली आहेत. याही कालावधीत गजानन नाट्य समाजाने दर्जेदार संगीत तसेच प्रोज नाटके सादर केली. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar


वामनराव पटवर्धन – गजानन नाट्य समाजाचे वैभव
वामनराव पटवर्धन एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, अतिशय साधी सरळ व्यक्ती पण मनाने दिलदार श्रीमंत. गजानन नाट्य समाजाचे वैभव होते. गजानन नाट्य समाजाचे नाटक म्हणजे वामनराव पटवर्धन यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. रंगभूमीसाठीच त्यांचा जन्म झाला होता. जन्मभर रंगभूमीवर काम केले व शेवट ही रंगभूमीवर. काय विलक्षण योगायोग ! भूमिका करणे, तालीम घेणे, कपडेपट, नेपथ्य सर्व काही करणारे वामनराव. वामनराव असले म्हणजे नाटक यशस्वी होणारच. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar


मला आठवते वामनराव १९७८ दरम्यान गुहागरला आले आणि माझ्याबरोबरच्या मित्रमंडळीत एकरूप झाले… अगदी वयात मोठे अंतर असून सुद्धा. ‘गाणे हे शतकाचे’, या बहारदार कार्यक्रमात मला दोन गाणी म्हणायची संधी वामनरावांमुळेच मिळाली. सर्व तरुणांना एकत्र करून वामनरावांनी आमचे “संशय कल्लोळ” नाटक बसवले. चार महिने तालीम घेतली. स्टेजवर नाट्यपद कसे म्हणावे, त्या आधीची वाक्ये कशी म्हणावी, हातवारे, हावभाव सर्वकाही मनापासून शिकवले. अश्विनशेठ ची भूमिका करताना मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या नाटकात रेवती – जयमाला जोगळेकर, फाल्गुन राव – रवी खाडीलकर, कृतिका – अनुराधा गोडबोले, भादव्या – उदय सावरकर, बुवा – नंदू मुसळे या सर्वांनी चांगल्या भूमिका केल्या. या नाटकाचे पाच प्रयोग तिकीट लावून झाले. देव माणूस, आग्य्राहून सुटका, बेबंदशाही इत्यादी नाटकातून काम करण्याची संधी गजानन नाट्य समाजामुळेच मला मिळाली. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar
त्याकाळात गणेशोत्सवाचे नाटक १० मे रोजी असे. अचानक निरोप आला यावर्षी मुंबईकर नाटक करणार नाही तुम्ही नाटक करा. ताबडतोब सभा घेऊन नाटक करायचे ठरले – “देव माणूस”. दिवसभर गाण्याची तालीम हरिभाऊ खरे घेत असत. रात्री प्रोजची तालीम. दहा दिवसांत तालीम होऊन सादर झालेले गजानन नाट्य समाजाचे हे नाटक. सर्वांनीच प्रचंड मेहनत घेऊन उत्तम नाट्य कृती सादर केली. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar


नटश्रेष्ठ वासुदेवराव जोशी
ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा असे व्यक्तिमत्त्व म्हणजे वासुदेवराव जोशी. देखणे, रुबाबदार. भूमिका करताना विलक्षण एकरूप होणारे. जबरदस्त शब्द फेक, उत्कृष्ट हावभाव. रंगभूमी दणाणून सोडणारा अभिनेता. आपले संपूर्ण आयुष्य नाटकासाठी वाहून घेतलेला नाट्यवेडा. सर्वांना प्रोत्साहन देणारा आधार. त्यांच्याबरोबर नाटकात काम करणे एक वेगळा अनुभव होता. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar
अगदी लहान भूमिकांपासून सुरुवात करून अनेक नाटकात प्रमुख भूमिका करणारा उदय सावरकर. पडदे बांधणे, फ्लॅटसीन, प्रकाश योजना सांभाळत नाटकातही काम करीत असे. त्याची पत्नी सविता सावरकर उत्तम अभिनय, गोड गळा असल्यामुळे संगीत तसेच प्रोज नाटकात तिने केलेल्या भूमिका अविस्मरणीय होत्या. संशयकल्लोळ मधील कृत्तिकेच्या भूमिकेसाठी रौप्य पदकही मिळाले होते. सिनेसृष्टीत किंवा नाट्यसृष्टीत व्यावसायिक कलाकार म्हणून गेली असती तर तेथेही ती चमकली असती. गजानन नाट्य समाजाच्या अनेक नाटकात उल्लेखनीय काम करणारा नट म्हणजे अशोक आठवले उर्फ बंडू आठवले बंडूने साकारलेला तळीराम अप्रतिमच होता. अविनाश आगाशे, वेलणकर पती-पत्नी, वसंत वझे, दत्ता आठवले यांचेही गजानन नाट्य समाजासाठी योगदान मोलाचे होते. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar


गजानन नाट्य समाजाचे यश
राज्य नाट्य स्पर्धेत संगीत शारदेला मिळालेला तृतीय क्रमांक. त्याच नाटकात अभिनयाचे रौप्यपदक मिळवणारा कृपाल परचुरे, अभिनय प्रमाणपत्र प्रथमेश दामले, गायन प्रमाणपत्र अनघा खरे, ऑर्गन वादक प्रशांत लेले द्वितीय क्रमांक. तसेच एकच प्याला नाटकातून अभिनयाचे रौप्य पदक मिळवणारा डॉ. मंदार आठवले. सभ्य गृहस्थ हो नाटकात अभिनयाचे प्रमाणपत्र मिळवणारी सौ. सावनी परचुरे. हे गजानन नाट्य समाजाचे यश आहे. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar
सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था
गजानन नाट्य समाजाने सामाजिक बांधिलकी ही जपली आहे. गजानन नाट्य समाजाचे मराठी नाट्य सृष्टीतील नामवंत नटांशी मैत्रीचे संबंध होते. नाना पटवर्धन, दादा परचुरे हे त्यात प्रमुख होते. शाळेच्या मदतीसाठी त्याकाळी अनेक नाटके सादर केली. नानासाहेब फाटक, बालगंधर्व, मनोहर सप्रे, राम मराठे, विनायकराव पटवर्धन, छोटा गंधर्व यासारखे दिग्गज नट गुहागर मध्ये आले. या नाटकांच्या माध्यमातून येणारे उत्पन्न शाळेच्या मदतीसाठी दिले जाई. त्यातूनच पश्चिमेकडील इमारत व रंगमंदिर १९६२ साली उभे राहिले. गुहागर तालुका नव्हे संपूर्ण जिल्हा अतिशय प्रेमाने रंगमंदिराकडे पाहत आहे. श्री व्याडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही गजानन समाजाने आर्थिक सहकार्य केले तसेच पाणी योजनेसाठी ही आर्थिक सहकार्य केले. मुंबईत राहून गावच्या उन्नतीसाठी लक्ष देऊन काम करणाऱ्या गजानन नाट्य समाजाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. गजानन नाट्य समाजाने शंभर वर्षे पूर्ण केली. एखादी संस्था सुरू करणे सोपे असते पण ती संस्था टिकणे कठीण असते व संस्थेने शंभर वर्ष पूर्ण करणे हे त्याहून फारच कठीण. मागील पन्नास वर्षात अनेकांनी नाटकात भूमिका केल्या त्या सर्वांचा नामोल्लेख करणे फारच कठीण आहे. आणि त्यामुळेच ही संस्था टिकून आहे व आजही दर्जेदार नाटके सादर करत आहे. गजानन नाट्य समाज संस्थेची वैभवशाली परंपरा पुढेही अशीच वृद्धिंगत होत राहो ही नटेश्वराशी व श्री गजाननाच्या चरणी विनम्र प्रार्थना. Gajanan Natya Samaj, Devpat, Guhagar