दि. २० मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
रत्नागिरी, ता, 15 : जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली असून, नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १,५६,९६० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्राचे अचूक मूल्यमापन करून दि. २० मे २०२६ पर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. Damage Assessment Surveys for Mango – Cashew
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री यांनी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने १३ मे २०२६ रोजी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करायचा आहे.
तीन विभागांच्या माध्यमातून संयुक्त पंचनामे नुकसानीचे मूल्यमापन पारदर्शक आणि अचूक व्हावे, यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांमार्फत ग्रामस्तरावर संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असून ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. Damage Assessment Surveys for Mango – Cashew
जिल्ह्यातील कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी १९ मे २०२६ पर्यंत आपल्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. यासाठी Agristack फार्मर ID, आधार कार्ड छायांकित प्रत (झेरॉक्स),७/१२ उतारा, बँक पासबुक छायांकित प्रत (झेरॉक्स) ही कागदपत्रे लागणार आहेत. Damage Assessment Surveys for Mango – Cashew
नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप व्यापक असल्याने प्रशासनाकडून हे काम अत्यंत वेगाने पूर्ण केले जात आहे. विहित मुदतीत कागदपत्रे जमा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Damage Assessment Surveys for Mango – Cashew
