गुहागर, ता. 03 : चिपळूण येथील तिवरे धरण दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण झाली असून धरणाच्या पुनर्बांधणीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनालाही गती मिळाली असली, तरी धरणफुटीच्या चौकशीसाठी नियुक्त एसआयटीचा अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने आणि दोषींवर कारवाई न झाल्याने धरणग्रस्तांमध्ये नाराजी कायम आहे. Chiplun-Tivare Dam Reconstruction Work
२ जुलै २०१९ रोजी मुसळधार पावसामुळे तिवरे धरण फुटून भेंदवाडीतील २२ घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर पुनर्बांधणी आणि पुनर्वसनाची घोषणा झाली; मात्र प्रत्यक्ष कामाला विलंब झाला. धरणग्रस्तांसाठी सुरुवातीला ४२ घरांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २४ घरे उभारण्यात आली. सध्या सिडकोमार्फत आणखी ३३ घरे बांधली जात असून एकूण ५७ कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक घरासाठी सुमारे २८ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. Chiplun-Tivare Dam Reconstruction Work

आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यानंतर ६२.७४ कोटी रुपयांच्या निधीतून धरणाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असून सध्या ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून पुढील वर्षी धरणात पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. Chiplun-Tivare Dam Reconstruction Work
दरम्यान, धरणफुटीप्रकरणी एसआयटीने जबाबदारी निश्चित केल्याचा दावा केला जात असला, तरी सात वर्षांनंतरही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. एसआयटीचा अहवाल तातडीने जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धरणग्रस्त अजित चव्हाण यांनी केली आहे. Chiplun-Tivare Dam Reconstruction Work
