१ ऑक्टोबर २०२६ पासून पहिल्या टप्प्याला होणार सुरुवात
नवीदिल्ली, ता. 05 : देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. विरोधीपक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर केली आहे. Caste-wise census in the country


भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चार राज्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ मार्च २०२७ पासून देशाच्या उर्वरीत भागात सुरू होईल. केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. देशात या अगोदरची जनजगणना काँग्रेस सरकार असताना झाली होती. सन 2011 मध्ये देशात जनगणना झाली, त्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र, देशभरात कोरोनाची महामारी असल्याने 2021 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे, आता 2027 पासून जनगणनेला सुरुवात होत असल्याने तब्बल 16 वर्षांनी जनगणना होत आहे. Caste-wise census in the country
दरम्यान, जनगणना दर 10 वर्षांनी घेतली जावी, अशी कायदेशीर तरतूद आहे. मात्र, केंद्र सरकारने नुकतेच जनगणना घेण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामध्ये, जातनिहाय जनगणना घेण्यात येणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले होते. देशात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. Caste-wise census in the country