रत्नागिरी व कोल्हापूर प्रशासनाकडून अवजड वाहतुकीवर तातडीने बंदी!
रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील ‘आंबा घाट’ क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. दोन्ही बाजूंना सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने मोठा अपघात घडण्याची आणि रस्ता खचण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. Amba Ghat is dangerous
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा तातडीचा उपाय म्हणून रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे आंबा घाटातील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या (Heavy Vehicles) वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. केवळ हलकी प्रवासी वाहने (कार, दुचाकी) आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच अत्यंत खबरदारीने व मर्यादित वेगाने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घाटातून रात्रीचा प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. Amba Ghat is dangerous
अवजड वाहनांची (ट्रक, ट्रेलर्स, डंपर्स) होणारी कोंडी आणि धोका टाळण्यासाठी प्रशासनाने खालील पर्यायी मार्ग केले आहेत:
पर्यायी मार्ग १: कोल्हापूर ➔ बाजारभोगाव ➔ अणुस्कुरा घाट ➔ पाचल/पाली ➔ राजापूर/रत्नागिरी.
पर्यायी मार्ग २: कोल्हापूर ➔ गगनबावडा (करूळ घाट) ➔ तळेरे ➔ मुंबई-गोवा महामार्ग ➔ रत्नागिरी.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. घाटाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारांवर (चेक पोस्ट) पोलीस बंदोबस्त व नाकाबंदी तैनात करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर व व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. Amba Ghat is dangerous
