( एक कृषी विस्तार अधिकारी)
गुहागर न्यूज : शेतक-यांच्या शेतावर MGNAREGA या देशव्यापी व अत्यंत महत्वाच्या, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनेंतर्गत फळबाग..आंबा, काजू, नारळ, सुपारी, फुलझाडे व इतर पिकांची लागवड करा.. भात,नाचणी, भाजीपाला, मिरची, वांगी, वाल-पावटा, कलिंगड लावा. आम्ही जि.प.सेस, पंचायत समिती सेस मधून तुमच्यासाठी योजना करतो. आर्थिक सहकार्य करतो. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय. आम्ही कृषी विभाग मार्गदर्शन करू. तुम्हाला सगळ्याप्रकारचे तांत्रिक सहकार्य करू. तेही ऑफीसमध्ये बसून नाही.! तुमच्या शेतावर येऊ…आज काहीही problem झाला की whats up सारखं यंत्र आपल्या हातात आहे. एका मिनीटात वरीष्ठ कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्याकडे समस्या, प्रश्न किंवा आलेल्या किड रोगाबाबतची माहिती पोहचवू शकतो. करा करा..एवढ्या जागा जमिनी रिकाम्या पडल्यात. आमचे अधिकारी सांगतात. तुम्ही शेतक-यांना भेटत नाही, योजना सांगत नाही.! प्रयत्न करा…खूप वाव आहे. फायदाही चांगला आहे…’ ही आमची नोकरीला लागल्यापासूनची कृषी विस्तार यंत्रणेची .. विशेषतः माझी सवय. शेतक-यांना लागवडीबाबत एखादी योजना सांगायला गेलं की पुढून प्रश्न येतो. धाडकन आपटतो आपल्या मनावर..(एखाद्याने अचानक नकळत आपल्या कानशिलावर लावावी तसा…)


“आता शेतक-यांनी काय करायचं? यांना हे होतंय ते डोळ्याने दिसत नाही ?” तो बिचारा शेतकरी हतबल होवून सवाल करतो. काय? काय झालं? आणि मग आपली योजना..त्यांना या योजनेचं..शेतक-यांच्या विकासाचं गणित पटवून सांगायचं आत्मसात केलेलं विस्तार यंत्रणेचं तंत्र…एका क्षणात ‘फेल’ व्हावं तसं होतं…आणि त्या हतबल शेतक-यांची व्यथा ऐकण्याशिवाय काहीच हातात राहत नाही !..हे संवाद सुरू असतात..शेतक-यांच्या शेतात..त्यांच्या बांधावर..त्यांची या वन्यप्राण्यांनी उधवस्त केलेली शेती……पाहत… ! निरूत्तर..!नि:शब्ध …!! स्तब्ध..!!! Agricultural damage from wild animals
“पूर्वी आम्ही आमच्या पाळीव पण मोकाट जनावरांचा प्रश्न पंचायतीत विचारायचो. आता जनावरेच कमी झाली. संपलीतच जवळपास. मात्र आता वानर-माकडं..आता 5-6 वर्षात रानरेडे -गवे यांचा उपद्रव वाढला. मागे तुम्हीच बघितलात कि कलिंगडाचे शेत कसं रानरेड्याने उध्वस्त केलं..” कौंढरचे शेतकरी नाना जोशी आपली व्यथा मांडत होते… बोलत होते. मागच्या वर्षीच तरूण शेतकरी सतीश धावडे यांचही कलिंगडाचं 40-50 हजार रूपयांचं माकडांनी नुकसान केलं..तोही तेव्हा सांगत होता. आम्ही हतबल होवून ऐकत होतो. Agricultural damage from wild animals


शेतक-यांची शेतं ह्या वन्यप्राण्यांमुळे नासधुस होताना.. नष्ट होत बघताना कृषी विभागातील अधिकारी ..काहीच करू शकत नाही. ‘वनखात्याने त्यांची वानर- माकडं, गवे, त्यांचे प्राणी त्यांच्या वनक्षेत्रात संरक्षीत ठेवा, सुरक्षीत ठेवा. ही कायद्यानुसार त्यांची जबाबदारी आहे. वानर- माकडं, गवे-रेडे हे काही पाळीव प्राणी नाहीत.? त्यांना त्यांच्या जंगलात ठेवा की.! आमच्या शेतक-यांच्या भात शेती, भाजीपाला कडधान्याची मळे, आंबा काजू, नारळ सुपारीच्या बागांचे नूकसान होत आहे. वानर- माकडं, गवे-रेडे या प्राण्यांनी शेतक-यांच्या शेतात घुसून नासधूस करायचं लायसन्स आहे काय वनखात्याकडे?’ असे साधे पण आम्हाला निरूत्तर करणारे.. प्रश्न शेतक-यांचे आहेत. विविध शासकीय योजनाच्या माधयमातून शेतक-यांच्या विकासाचं गणित कागदावर मांडतांना याकडे कृषी विभागासह इतर यंत्रणेने दुर्लक्ष करून चालेल??? Agricultural damage from wild animals