वर्षभरात २३२ संशयित रुग्ण, १७ जणांना कर्करोगाचे निदान
गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्ह्यात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या वैद्यकीय आकडेवारीनुसार २०२५-२०२६ वर्षात जिल्ह्यात तब्बल २३२ रुग्णांमध्ये कर्करोग पूर्व लक्षणे आढळून आली असून १७ रुग्णांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट निदान झाले आहे. या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. Oral cancer
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२०२६मध्ये जिल्ह्यात विविध आरोग्य शिबिरे आणि रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये २३२ रुग्णांच्या तोंडात कर्करोगपूर्व बदल म्हणजेच पांढरे किंवा लाल चट्टे पडणे, तोंड कमी उघडणे यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत. कर्करोगाच्या रूग्याला वेळेत उपचार न मिळाल्यास या लक्षणांचे रुपांतर गंभीर कर्करोगात होण्याचा मोठा धोका असतो. जिल्ह्यातील १७ रुग्णांना तपासणी दरम्यान संशयित कर्करोगाची लागण आढळलेल्या रुग्णांच्या पुढील बायोप्सी आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १७ रुग्णांना तोंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झालेआहे. या बाधित रुग्णांवर सध्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये पुढील उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती आली. Oral cancer

रत्नागिरी जिल्ह्यात कर्करोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम आणि तंबाखू मुक्ती अभियान अधिक तीव्र करण्याची आवश्यकतानिर्माण झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. वाढत्या प्रमाणाची मुख्य कारणे गुटखा, तंबाखू, मावा, खर्रा यांचे वाढते सेवन हे या आजाराचे मुख्य कारण आहे. तर सिगारेट, बिडी आणि मद्यपानाच्या अतिसेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. लवकर तपासणी न करणे, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजार बळावतो, तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्या व्यक्तींना तोंडात पांढरे चट्टे पडणे, न भरणारी जखम किंवा तोंड उघडण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, कॅन्सर पूर्व स्थितीलाच जर व्यसन सोडले आणि योग्य उपचार घेतले, तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकतो असे रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. Oral cancer