मंदोस, जेलीफिश, पावसाळी वातावरणाने मासेमारी ठप्प ; आंबा बागायतदार धास्तावले
गुहागर, ता.17 : मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव, सागरातील जेलीफिशचे आक्रमण आणि आता ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसात पावसाची शक्यता असे तिहेरी संकट हातात हात घालून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आल्याने येथील मासेमारीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. तसेच ढगाळ हवामान असल्याने कोकणातील आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. Triple threat to Konkan fisheries
गेली ४ वर्षे किनारपट्टीतील मच्छिमार बांधव पुरता कोलमडलेला आहे. आणि आता या अचानक आलेल्या संकटांनी मच्छिमार उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कित्येक वर्षे शासनदरबारी धूळखात पडलेले मच्छिमारांचे प्रश्न आश्वासनांच्या फेऱ्यात सापडलेले असतानाच निसर्गनिर्मित हे दृष्टचक्र किनारपट्टीत घोंघावत आहे. Triple threat to Konkan fisheries
कोकण किनारपट्टीवरील मासेमारीला गेले चार दिवस मोठ्या मर्यादा आलेल्या आहेत. मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव पडण्यापूर्वी जेली फिशचे नवे संकट अचानक आले. विशेष म्हणजे यापूर्वी अपवाद वगळता फारसे कधी न आढळलेले विषारी जेलीफिश कोकण समुद्र किनाऱ्यावर आढळून येऊ लागले आहेत. हे जेलीफिश प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर आढळून येत आहेत. कोकणातील मच्छिमार मच्छिमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातात. त्यांना मासळीही तितक्याच विपूल प्रमाणात मिळते. परंतु मागील काही दिवसांपासून मच्छिमारांच्या जाळ्यामध्ये विषारी असे जेलीफिश आढळून येत आहेत. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या मच्छिमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. Triple threat to Konkan fisheries
मच्छिमार सांगतात की, जेलीफिशचा डंख झाल्यास अंगाला, हातापायांना खाज सुटते. जेलीफिश विषारी असल्याने त्याचा मासळी मिळण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे मत्स्य उत्पादनात मोठी तूट निर्माण होते. सध्या विषारी जेली फिश माशांची संख्या बळावली असल्याने समुद्रकिनारी बोटी नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. आधीच मत्स्यदुष्काळ असताना, बोटी किनारी नांगरण्याची वेळ मच्छिमारांवर आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
वातावरणातील बदलामुळे व समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अलिकडे मासेमारीला मोठ्या मर्यादा आलेल्या आहेत. समुद्रात मासे मिळणे अवघड झाले आहे. कोरोना आपत्तीत दोन वर्षे मासेमारी व्यवसाय पूर्णतः ठप्प होता. मात्र, लाँकडाऊननंतर मासेमारीला सुरुवात झाली. त्यातून सावरत असतानाच मच्छिमारांना खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव गेले चार दिवस जाणवत आहे. बोटी किनाऱ्याला आहेत. मासेमारी ठप्प असल्याने मच्छिमारांसमोर मोठ्या आर्थिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. मध्यंतरी पर्ससीन व एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीचा मुद्दाही ऐरणीवर आलेला होता. अशा मासेमारीमुळे समुद्र तळाशी असलेले छोटे मत्स्यजीव धोक्यात आलेले आहेत. सरसकट मासेमारीचा परिणाम मत्स्यसाठ्यावर होऊन उरलीसुरली मासळी नष्ट होत आहे. Triple threat to Konkan fisheries
आंबा संरक्षक फवारणी खर्च वाढणार
बंगालच्या उपसागरात मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव सुरू झाला असून, दोन दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच अपेक्षित गारठा नसून ढगाळ हवामान असल्याने कोकणातील आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे किडरोग संरक्षक फवारण्या व त्यावरील खर्च वाढणार आहे. सध्या केवळ पालवी असून, किरकोळ आलेला मोहोर व पालवीचं संरक्षण करण्यासाठी बागायतदारांना हवामानाचा अंदाज घेत फवारण्या कराव्या लागत आहेत. पालवीचे मोहोरात व मोहोराचे फळात रूपांतर होत असताना प्रतिकूल हवामानाचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. वेळोवेळी फवारण्या कराव्या लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहे. Triple threat to Konkan fisheries

