त्याच त्याच चुका पुन्हा करू नका
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355
मित्रांनो एखादी चूक झाली की आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. चूक छोटी असो किंवा मोठी असो, आपण चूक केल्याचं ज्यावेळी स्वतःला कळतं, त्यावेळी खूप त्रास होत असतो.
उदाहरण १ : कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्या तरी स्कीम मध्ये आपण पैसे गुंतवतो आणि नंतर कळतं ही कंपनी फ्रॉड आहे.
काही वर्षानंतर पुन्हा एखादी स्कीम येते, आपण आपल्याला माहीत असल्यासारखे अनेक प्रश्न विचारतो, त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली असे आपल्याला वाटते आणि पुन्हा एकदा आपण अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवतो. नंतर कळते की ही कंपनी देखील फ्रॉड आहे. मित्रांनो आपल्याला एकदा अनुभव येऊन सुद्धा आपण योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे पुन्हा आपण तिच चूक करतो.
उदाहरण २ : १०वी च्या वेळी तुम्ही वाईट मित्रांच्या संगतीला लागला होता, तुम्ही मन लावून अभ्यास केला नव्हता व त्यामुळे तुम्ही त्यावेळी परीक्षेत फेल झाला होता. परीक्षेत फेल झाल्यामुळे आई-वडिलांच्या कडून तुम्हाला मार खावा लागला होता, बोलणं खावं लागलं होतं.
पुन्हा एक दोन वर्ष व्यवस्थित जातात आणि पुन्हा कोणीतरी मित्र तुमच्या आयुष्यात येतो. त्याच्याशी एवढी मैत्री वाढते की नंतर तो जे सांगतो तेच तुम्हाला योग्य वाटत असतं, पुन्हा बारावीच्या परीक्षेत अभ्यासावरचं लक्ष हटतं आणि तुम्हाला अपेक्षित मार्क्स मिळत नाहीत. पुन्हा आई-वडिलांचं बोलणं खावं लागतं. यावेळी तुम्ही थोडे मोठे झालेला होता, म्हणून तुम्हाला मार मिळत नाही. परंतु फेल झाल्याचे दुःख हे नेहमीच राहतं.
उदाहरण ३ : कधीतरी तुमचं एखाद्या मुलीवर प्रेम जडलं होतं. तिच्यावर तुमचा वेळ व पैसा खर्च होत होता. हे प्रकरण तुमच्या आई-वडिलांना समजलं, आणि तुम्हाला फटके पडले होते.
काही वर्षे निघून गेली. तुमचं कॉलेज होऊन, तुम्ही नोकरीला देखील लागला. आता तुमचे आई-वडील तुमच्या पासून राहायला लांब असतील. अशावेळी कोणीतरी मुलगी/ स्त्री तुम्हाला भेटते, तुम्ही तिच्या प्रेमात पडता. यावेळी तुम्हाला बघणारं कोणी जवळ नसतं. हळूहळू कळू लागते की ती मुलगी/ स्त्री तुम्हाला फसवत आहे. त्यावेळी शारीरिक फटके तुम्हाला पडत नाही, मानसिक दृष्ट्या खूप त्रास झालेला असतो.
मित्रांनो अशा भरपूर घटना तुमच्या जीवनात घडल्या असतील. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चूका केल्या असतील. व ठराविक काळानंतर तुम्हाला शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास देखील झालेला असेल. अशीच काही उदाहरणे खाली दिलेली आहेत या ठिकाणी फक्त परिणाम दाखवलेला आहे. या घटनांमध्ये तुमची चूक कोणती ते स्वतःच ओळखा आणि त्याच्यावर काम करा
*तुम्ही कोणत्यातरी बिल्डरकडे घर बुक करता, परंतु त्याचं काम अनेक वर्ष रखडलेलं असतं. त्यामुळे तुमचा पैसा अडकून राहतो आणि तुम्हाला मानसिक त्रास होत असतो.
*तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या एखाद्या सवयीमुळे, तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला त्रास होत असतो. अपमान होत असतो.
*लग्न जमवताना तुमची फसवणूक झालेली असते.
*गाडी घेताना तुमची फसवणूक झालेली असते
*ऑनलाइन फ्रॉड मध्ये तुमचे पैसे गेलेले असतात.
*तुमच्या एखाद्या खराब सवयीमुळे तुमचा नवरा, तुमची मुलं किंवा इतर नातेवाईक तुमच्यापासून दूर गेलेले असतात.
*एखाद्या कामात हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ करणे.
* विनाकारण तुम्ही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर चिडत असता.
मित्रांनो प्रत्येक वेळेला तुमचं काही चुकलं असेल असं नाही, काही वेळेला चूक तुमची नसते. चूक समोरच्याची असते, परंतु त्या व्यक्तीसोबत संबंध जोडणे, त्यांचा सल्ला ऐकणे ही पण एक चूकच आहे. एखादा निर्णय चुकला तर त्याच्यावर घरामध्ये चर्चा व्हायला हवी. जर तुमच्या व्यवसायासंबंधी, पैशाविषयी चूक झाली असेल, तुम्हाला नुकसान सहन करावे लागले असेल, तर असं का झालं त्यावर विचार व्हायला हवा. ही गोष्ट तुमच्या आर्थिक सल्लागाराला अथवा सीए ला सांगितली गेली पाहिजे . तू तुम्हाला योग्य सल्ला देईल व पुन्हा तुम्ही ती चूक करणार नाही
त्याकरता पहिली पायरी आहे, चुका स्वीकारण्याची, चूक कबूल करण्याची!
त्या विषयासंबंधी तज्ञांचा सल्ला घ्या, वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्या.
तुमच्या मनात ठाम निर्णय करा. जेणेकरून पुन्हा तुमच्याकडून ती चूक होणार नाही
मित्रांनो असं म्हणतात की, जो चुकतो, तो माणूस.
परंतु मी म्हणतो, जो चुकतो, तो माणूस! जो स्वतःची चूक कबूल करतो आणि त्यात सुधारणा करतो, तो ग्रेट माणूस!!
आज पासून स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा, कोणताही निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा, गरज लागल्यास तज्ञांचा सल्ला घ्या व तो सल्ला अंमलात आणा.
आयुष्यामध्ये तुम्ही लवकरच यशाचे शिखर प्राप्त कराल यात शंका नाही
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -18 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद,
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद