चांगली शेती करा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो तुम्ही हे बघितलं असेल की आपण जेव्हा नातेवाईकांकडे, एखाद्या मित्राकडे पाहुणा म्हणून जातो, त्यावेळी आपण आपल्या शहरांमध्ये/ गावामध्ये असलेली एखादी प्रसिद्ध मिठाई/ वस्तू घेऊन जातो. उदाहरणार्थ नागपूरची ऑरेंज बर्फी, मुंबईचा माहीम चा हलवा, पुण्याची बाकरवडी, वगैरे वगैरे.
समजा तुम्ही एखाद्या गावात शेतकरी मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे राहायला गेलेला आहात. आपण निघताना तो शेतकरी आपल्याला बरोबर काय देतो?
अर्थातच त्याच्या शेतामध्ये जे पिक घेतले जाते, ते तो शेतकरी पाहुण्यांना देत असतो.
उदाहरणार्थ. एखाद्या शेतकऱ्याकडे भुईमुगाच्या शेंगा भरपूर प्रमाणात होत असतील, तर तो जाताना भुईमुगाच्या शेंगा तुम्हाला देतो.
एखाद्याकडे तांदूळ किंवा गहू जास्त प्रमाणात पिकवला जात असेल तर तो जाताना पाहुण्यांना तांदूळ किंवा गहू देतो.
एखादी व्यक्ती कोकणामधील असेल, तर तो जाताना कोकणात जे पिकते ते म्हणजेच काजू, कोकम किंवा आंब्याच्या सीझनमध्ये आंबे किंवा फणस किंवा कोकणचा मेवा या गोष्टी देतो.
कोणा शेतकऱ्याकडे ऊसाचं पीक जास्त असेल, तर तो जाताना चांगले ऊस आणून त्याचे बारीक तुकडे करून तुम्हाला व्यवस्थित बांधून देत असतो.
म्हणजेच त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये, त्याच्या वाडीमध्ये जे उत्पन्न जास्त प्रमाणात असतं, तेच तो तुम्हाला देत असतो. मित्रांनो, आपण देखील एकमेकांना भेटत असतो. कधी प्रत्यक्ष, कधी व्हाट्सअप वर/ फेसबुक वर, तर कधी फोन कॉलवर.
मित्रांनो आपण दुसऱ्याला काय देतो? चांगले शब्द, प्रेम, आधार, प्रेरणा की वाईट शब्द, राग, द्वेष, तिरस्कार व दुःख?
मित्रांनो आपण बघितलेच आहे की ज्या व्यक्तीकडे जे मुबलक प्रमाणात असतं, तेच तो इतरांना देऊ शकतो. मग जर तुम्ही दुसऱ्यांना चांगले शब्द देत असाल, तर तुमच्याकडे त्याचं पीक जास्त आहे असा अर्थ होतो. जर तुम्ही इतरांना प्रेम,आपुलकी, स्नेह देत असाल, तर तुमच्याकडे ती गोष्ट भरपूर प्रमाणात आहे असा त्याचा अर्थ होतो.
जर तुम्ही एखाद्याला धीर, आधार, प्रेरणा देत असाल तर तुमच्याकडे देखील या गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत याचा अर्थ होतो.
जर तुम्ही एखाद्याला वाईट शब्द, अपमान, दुःख देत असाल, तर तुमच्याकडे या गोष्टींचा संग्रह जास्त आहे असा याचा अर्थ होतो.
मित्रांनो, एखाद्याने तुम्हाला दिलेली भेट, जर तुम्हाला आवडली तर त्या घरात तुम्हाला पुन्हा जावेसे वाटते, तशी इच्छा होते, आणि जर एखाद्याने दिलेली भेट तुम्हाला आवडली नाही, त्याचा पाहुणचार आवडला नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा जाण्याची इच्छा होत नाही. मग ते प्रत्यक्ष भेटणं असो किंवा व्हाट्सअप मेसेज वरून भेटणं असो किंवा फोन कॉल वर भेटणं असो. बरोबर ना?
मित्रांनो आज तुम्हाला स्वतःचं अवलोकन करायचं आहे. तुम्ही इतरांना काय देत आहात? किती लोकांना तुमच्याशी बोलायला आवडतं? किती लोकांना तुमच्या घरी यायला आवडतं?
मित्रांनो जर तुम्ही दिलेली भेट योग्य नसेल, चांगली नसेल असं तुम्हाला वाटत असेल, तर याचा अर्थ तुमच्या शेतामध्ये चांगलं पीक येत नाही. मग तुम्हाला तुमच्या शेतामधील पीक बदली करायला हवं. तुमच्या शेतीची चांगली मशागत करायला हवी. नको असलेलं अविश्वासाचं, संशयाचं, रागाचं, वाईट शब्दांचं तण काढून टाका आणि चांगलं बियाणं पेरा. मग बघा, तुमच्या शेतामध्ये कसं चांगलं पीक येतंय ते!
तुम्ही जर चांगली वस्तू, चांगले शब्द, प्रेम, आपुलकी, चांगले विचार इतरांना भेट देऊ लागलात, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला देखील चांगलीच भेट मिळेल यात शंका नाही
मी आशा करतो की तुम्हाला इतरांनी भरभरून चांगल्या गोष्टी, चांगली मिठाई भेट देवो
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -10 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा