बाबासाहेब राशिनकर, हा विचार सर्वप्रथम छत्रपतींनी रुजवला
गुहागर, ता. 22 : सागरी सीमा बळकट करण्याचा विचार रुजविणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कोकणातील रयतेला सोबत घेवून आरमार उभे केले. आजही आपल्या सागरी सीमा मजबुत असणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपतींच्या राष्ट्रवादाचा विचार सागरी सीमावर्ती भागातील गावागावात जागला पाहिजे. असे प्रतिपादन बाबासाहेब राशिनकर यांनी केले. ते दाभोळ येथे आरमार दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. Maritime border must be strengthened

दापोली तालुक्यातील दाभोळ येथे सागरी सीमा मंच आणि हिंदु गर्जना या दोन संस्थांच्या वतीने 21 ऑक्टोबरला आरमार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दाभोळ बंदरावर सागर व बंदराचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बंदरावरच छोटीशी सभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख व गुहागरमधील ज्ञानरश्मि वाचनालयाचे संचालक बाबासाहेब राशिनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Maritime border must be strengthened

राशिनकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे दुरदृष्टी होती. तसेच ते उत्तम संघटकही होते. त्यांनी सागरी सीमांच्या सुरक्षेचे महत्त्व जाणून प्रथमच मराठा राजवटीत आरमाराची स्थापना केली. कोकण किनारपट्टीवरील मायनाक भंडारी, सरखेल कान्होजी आंग्रे आदी स्थानिकांना सोबत घेतले. कोकण किनारपट्टीवरुन समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवता यावे म्हणून जलदुर्ग बांधले. त्यामुळेच आपल्या देशावर होणारी अनेक आक्रमणे रोखता आली. त्यांची शक्ती आणि व्याप्ती कमी करता आली. शिवाय स्थानिकांना रोजगाराचे विविध पर्यायही उपलब्ध झाले. आजच्या काळाचा विचार करता मुंबईवर झालेल्या सर्व हल्ल्यांमधील दहशतवादी समुद्रमार्गेच आपल्यापर्यंत पोचले. त्यामुळे आजही आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी सागरी सीमांवर रहाणाऱ्या सर्वांनी सजग असण्याची आवश्यकता आहे. आपल्या आजुबाजुला काय घडत आहे याकडे डोळसपणे पहाण्यासाठी सुरक्षेचा विचार मनात कायम असला पाहिजे. हा विचार बिंबविण्यासाठी आरमार दिन हे निमित्त आहे. Maritime border must be strengthened

यावेळी सतिश भाई टोपरे, हिंदु गर्जनाचे अध्यक्ष अमित देवळेकर, रोहन यादव उपाध्यक्ष, देवेंद्र दाभोळकर, देवेंद्र कोळथरकर, सागरी सीमा मंचचे जिल्हा सहसंयोजक प्रशांत शिरगांवकर, शक्तीकेंद्र प्रमुख प्रविण वणकर, सह शक्तीकेंद्र प्रमुख अनिकेत पालशेतकर, अमोल खडपकर, मुकेश भाटकर, विनायक पदुकले, सुभाष पुरकर, दिपक कुटरेकर, सिकंदर खडपकर, नितीन यादव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Maritime border must be strengthened
