सलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु
गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु, राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा आजही प्रतिसाद मिळालेला नाही. येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणी नुसार वीज निर्मिती करत आहे. गेले तीन आठवडे प्रकल्पातून दोन टप्प्यात 1300 आणि 400 मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. 1300 MW power generation from RGPPL


तालुक्यातील अंजनवेल याठिकाणी उभारण्यात आलेला एन्रॉनचा दाभोळ वीज प्रकल्प आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प १९९५ साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात वादग्रस्त ठरला होता. सध्या एनटीपीसी या कंपनीतील प्रमुख भागधारक आहे, तर राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. किफायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यासाठीच केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू ठेवणे गरजेचे आहे. गतवर्षी केंद्र सरकारने हा प्रकल्प टिकला पाहिजे, म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मात्र, या बैठकीनंतर कोणतीही कार्यवाही झालेली दिसली नाही. 1300 MW power generation from RGPPL


वीज दरवाढीमुळे तत्कालीन फडणवीस सरकारने प्रकल्पातून वीज घेणे बंद केले होते. त्यानंतर कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॉटचा करार करून प्रकल्प सुरू ठेवला. सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आला. महागड्या दरामुळे नवीन वीज खरेदी करार झाला नाही. सद्या काही उद्योगांच्या मागणीनुसार कंपनी व्यवस्थापन वीज निर्मिती करत आहे. चार गॅस टर्बाईन आणि दोन स्टीम टर्बाईन मधून सायंकाळी 6 ते रात्री 12.30 या वेळेत 1300 मेगावॉट तर रात्री 12.30 ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजे पर्यंत 400 मेगावॉट वीज तयार करून ती विकली जात आहे. 1300 MW power generation from RGPPL