सुनित आठवले, गुहागर (8408010196)
Guhagar News : वासुदेवशास्त्री ह्यांचे मूळ घराणे आणि जन्मस्थळ हे गुहागरचे आहे. त्यांचे मूळ घर हे वरचापाट येथील सध्याचे वासुदेव खरे (बाळा खरे) ह्यांचे घर होय. त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्याबद्दल काही माहिती इथे देत आहे. Vasudevshastri Khare
वासुदेव वामनशास्त्री खरे ऊर्फ वासुदेवशास्त्री खरे (जन्म : गुहागर येथे ५ ऑगस्ट १८५८ – ११ जून १९२४) गुहागर मध्ये इयत्ता सहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर ते पुढील विद्याभ्यासासाठी साताऱ्यास गेले. 1872 मध्ये पूर्वाश्रमीच्या यमू सोमण ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. साताऱ्यातील तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर ह्यांच्याहाताखाली वासुदेवशास्त्रींनी काव्ये, तर्कसंग्रह व व्याकरण यांचा अभ्यास केला. पुण्याच्या नेने मास्तरांबरोबर झालेल्या भेटीनंतर ते नेने मास्तरांच्या जागी बदली नोकरीवर पुण्यात आले. पुण्यात आल्यावर माधवराव कुंटे, श्रीधर विठ्ठल दाते, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सार्वजनिक काका, विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा थोर व्यक्तींसोबत भेट झाली. पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या काव्येतिहास संग्रह ह्यात काही वेळा संस्कृत विभागाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांनी शाळेतील आपली नोकरी सोडून टिळक, आगरकर व विष्णूशास्त्री यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. Vasudevshastri Khare
टिळक व आगरकर यांनी काढलेल्या वर्तमानपत्राला ‘केसरी’ हे नाव वासुदेवशास्त्री यांनी सुचवले होते. पुढे त्यांनी पुणे सोडले व २८ नोव्हेंबर १८८० रोजी ते मिरजेत नव्याने स्थापन झालेल्या हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रुजू झाले. केसरीच्या पुढच्या काही अंकांमध्ये मूळ संस्कृत श्लोकाचा केलेला मराठी अनुवाद असे. तो श्लोक असा होता-
गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरूतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
वासुदेवशास्त्रींनी संपादित केलेले साहित्य:
•अधिकारयोग अथवा नानास राज्याधिकार मिळाल्याचा इतिहास (1908)
•नाना फडणवीसांचे चरित्र (1927)
•इचलकरंजी संस्थानचा इतिहास (1913)
•मालोजीराजे व शहाजीराजे ह्यांच्याबद्दलचे लेखन
.मराठी राज्याचा उत्तरार्ध (खंड 1) (1920)
•हरिवंशाची बखर/पटवर्धन सरदारांची हकिकत
* इचलकरंजी संस्थानचा इतिहास (1913)
शास्त्रींनी लिहिलेली नाटकं
•गुणोत्कर्ष (1885) – शिवाजी–संभाजी संबंधांवर
•तारामंडळ (1914)
•चित्रवंचना (1917)
•शिवसंभव (1919)
•उग्रमंगल (1922)
•देशकंटक (1930)
काव्यलेखन
•समुद्र (1884)
•यशवंतराय हे महाकाव्य (1888)
संदर्भग्रंथ
* गुरूवर्य वासुदेव वामन शास्त्री खरे चरित्र व ग्रंथपरिचय (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
* लेखक – दामोदर मोरेश्वर भट.
