मोडकाआगर धरण पुल : ठेकेदाराने आश्र्वासन पाळले
गुहागर, ता. 11 : अखेर गेली चार वर्ष चर्चेत असलेल्या मोडकाआगर धरणावरील नव्या पुलावरुन 11 जूनला वहातूक सुरु झाली आहे. ठेकेदाराने 18 मे रोजीआमदार जाधव यांच्या उपस्थितीत महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि गुहागरच्या जनतेला 15 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पुलावरुन वहातूक सुरु करतो असे आश्र्वासन दिले होते. हे आश्र्वासन ठेकेदाराने पाळले आहे.
The contractor had assured the Highways Authority officials and the people of Guhagar in the presence of MLA BhaskarJadhav on May 18 that traffic would start from the bridge by June 15 in any case. This assurance is complied with by the contractor.
मोडकाआगर धरणावरील वादग्रस्त जुना पूल तोडलेला नाही. पुलाचे काम करण्यासाठी संपूर्ण धरणात भरावाची भिंत तयार करण्यात आली होती. त्यामुळे धरणारचे विभाजन दोन भागात झाले होते. नव्या पुलाचे काम झाल्यानंतर ठेकेदाराने पुलाच्या स्लॅब खालील मातीत काढण्यास सुरवात केली होती. एक कप्प्यातील माती पूर्णपर्ण काढून झाल्याने तेथून धरणातील पाणी प्रवाहित झाले आहे. दुसऱ्या कप्प्यातील माती काढण्याचे काम वेगाने सुरु आहे.


बहुचर्चित पुल
चार वर्षांपूर्वी मोडकाआगर धरणावरील पुल वहातूकीस नादुरुस्त ठरवून बंद करण्यात आला. शासनाने पुलाच्या दोन्ही बाजुला दगड मातीचे ढीग रचून पुलावरुन वहातूक बंद केली. त्यामुळे गुहागर आणि परिसरातील जनतेला 1 वर्ष रानवी मार्ग शृंगारतळी प्रवास करावा लागत होता. अखेर जनतेने शासनाचे नियम तोडून या पुलावरुन वहातूक सुरु केली. ती इतकी नियमीत झाली की शासकीय अधिकारी देखील आपणच घातलेले निर्बंध विसरुन याच पुलावरुन ये जा करत होते. परंतू मोडकाआगर पुल बंद झाल्याने 2019 मध्ये झालेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रशासकीय मुख्यालयाची जागा बदलली. मतमोजणीसाठी लवेलचे अभियांत्रिकी महाविद्यालय घ्यावे लागले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च मध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली. महिन्याभराने लॉकडाऊनचे नियम शिथील केले गेले. तेव्हा एप्रिल 2020 अखेरीस ठेकेदाराने नव्या पुलाच्या बांधकामाला सुरवात केली. पुन्हा वहातूक बंद झाली. 2020 चा संपूर्ण पावसाळा रानवीमार्ग वहातूक सुरु होती. पावसाळा संपल्यावर वरवेलीतील ग्रामस्थांनी 12 लाख खर्च करुन पर्यायी मार्ग सुरु केला.
दरम्यानच्या काळात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत राजकीय नाट्य रंगले होते. पण लोकांच्या समस्येवर उत्तर काढण्यात राजकीय नेते यशस्वी झाले नाहीत. किंबहुना जाणिवपूर्वक ही समस्या तशीच ठेवण्याचे काम झाले. जनता तक्रार न करता निमुटपणे सारे काही सहन करत होती. अखेर दिवाळी नंतर ठेकेदाराने पुन्हा पुलाच्या कामाला सुरवात करताना धरणात मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता वहातुकीस खुला केला.
18 मे रोजी आमदार भास्कर जाधव तौक्ते वादळानंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये आले होते. तेव्हा महामार्गाचे अधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्यांनी मोडकाआगर पुलाची पहाणी केली. तेव्हा मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने यांनी 15 जूनपर्यंत पुलावरुन कोणत्याही परिस्थितीत वहातूक सुरु होईल. असे आश्र्वासन दिले होते. हे आश्र्वासन पाळताना चार दिवस आधीच नव्या पुलावरुन वहातूकीला सुरवात केली आहे.
(मोडकाआगरच्या नव्या पुलावरुन वहातूक कशी सुरु आहे याचा व्हिडिओ पहाण्यास विसरु नका.)