गुहागर, ता. 16 : राज्यात एप्रिल महिन्याच्या मध्यावरच उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. गेल्या 48 तासांत कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. उलट राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा सातत्याने चढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात उष्णतेचा तडाखा वाढला आहे तर कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. The heatwave has intensified
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अकोल्यात मागील 24 तासांत तब्बल 44.2 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीतही तापमान 44 अंशांच्या पुढे गेल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर तापमान 45 अंशांच्या पुढे जाऊन “हाफ सेंच्युरी” गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्धा जिल्ह्यात परिस्थिती विशेषतः चिंताजनक बनली असून तापमान 43 ते 45 अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. The heatwave has intensified
दरम्यान, उष्णतेच्या लाटेमुळे रुग्णसंख्येतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोके गरगरणे, अशक्तपणा, उलट्या, ताप अशा लक्षणांसह उष्माघाताचे रुग्ण वाढू शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे वापरावेत, तसेच गरज नसल्यास उन्हात फिरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन केले आहे. The heatwave has intensified
