एजन्सी, अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष, यापूर्वीही झाला होता अपघात
गुहागर, ता. 11 : शृंगारतळी ते गुहागर रस्त्याचे काम उरकुन टाकल्याचा फटका आता वहातूकदारांना बसु लागला आहे. आज पाटपन्हाळे कॉलेजजवळ साईडपट्टीला टाकलेल्या भरावात एस.टी. रुतली. यापूर्वीही मोडकाआगर ते गुहागर दरम्यान अरुंद रस्त्यावरुन एक प्रवासी बस कलंडली होती. त्यामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत सर्वत्र नाराजीचा सुरु आहे.
शृंगारतळी ते गुहागर रस्त्याचे काम करताना अनेक ठिकाणी ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले आहे. पावसाचा पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाही केलेली नाही. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. आज सकाळी गुहागर आगारातील एक बस शृंगारतळीकडून गुहागरकडे येताना पाटपन्हाळे कॉलेजजवळ साईडपट्टीच्या भरावात रुतली. ही बस इतकी फसली की अखेर जेसीबीच्या साह्याने ओढून काढावी लागली. मात्र हा जेसीबी उपलब्ध करुन देण्यासही ठेकेदाराने दोन ते तीन तासांचा कालावधी घेतला. शृंगारतळीतील मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह काहीजणांनी सातत्याने ठेकेदाराला फोन केले. तेव्हा जेसीबी उपलब्ध झाला.
पाटपन्हाळे कॉलेजजवळ महामार्गाचे काम करताना डोंगर पोखरण्यात आला होता. हा डोंगर पोखरताना दरड न कोसळणार नाही यासाठी सुरक्षेचा कोणताही उपाय ठेकेदाराने केला नाही. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुने पाणी जाण्याची व्यवस्थाही केली नव्हती. जून महिन्यात झालेल्या पावसात येथील एकेरी मार्गावर दरड कोसळली. पावसाचे पाणी रस्त्यावर साठले. अखेर महिनाभर हा रस्ता कोणतीही डागडुजी न करता ठेकेदाराने बंद ठेवला. 9 जुलैला काम बंद करुन सुट्टीवर जाण्यापूर्वी दरडीची माती रस्त्याच्या कडेला ठेकेदाराने पसरली. याच मातील एस.टी. रुतली होती. अखेर तासाभराच्या मेहनतीनंतर एस.टी. काढण्यात आली.
ठेकेदाराचे काम योग्य पध्दतीने सुरु आहे की नाही याचे परिक्षण करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या एजन्सीचे अधिकारी नेमके काय काम करतात असा प्रश्र्न निर्माण झाला आहे. शृंगारतळी ते गुहागर दरम्यान ठेकेदाराच्या कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येथील ग्रामस्थांनी हा विषय महामार्ग अधिकाऱ्यांपर्यंत पोचवला की ते एजन्सीकडे बोट दाखवून मोकळे होतात. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी, गलथान कारभाराबाबत गुहागर, शृंगारतळीमधुन नाराजी व्यक्त होत आहे.