सार्वजनिक बांधकाम; 15 गावांचा संपर्क तुटणार
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पालशेत बाजारपुलाच्या एका खांबावर दगड आपटून पुल कमकुवत झाला आहे. त्यामुळे गुरुवार 14 जुलैपासून वहातुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने घेतला आहे. परिणामी अडूर, वेळणेश्र्वर, हेदवी आदी 15 गावांशी एस.टी. आणि अवजड वाहने जाऊ शकणार नाहीत.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता कु. सलोनी निकम यांनी बुधवारी 13 जुलैला तहसीलदार, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, सरपंच पालशेत ग्रामपंचायत, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकाऱ्यांना पुलावरील वहातूक बंद ठेवण्याबाबत कळवले आहे. या पत्रात पालशेत बाजारपेठेतील पुलाचे तीन खांब कमकुवत झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
याबाबत अभियंता निजसुरे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, गेले दोन दिवस नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लाकडे, दगड या पुलावर आदळले आहेत. त्यामुळे पुलाच्या खांबांचे पुर्वेकडील दगडांनी जागा सोडली आहे. जुने बांधकाम चुना, गुळ आणि माती वापरुन केलेले आहे. सतत पुराचे पाणी वेगाने आत जावून पुलाच्या खांबांचे दगड पडू शकतात. पावसाळ्यात अवजड वहातूकीमुळे पुल पडू शकतो. अपघात होव शकतो. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हा पुल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर पुल बंद झाल्यावर अडूर, वेळणेश्र्वर, हेदवी, नरवण आदी 15 गावांचा गुहागरशी संपर्क तुटणार आहे. दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना बारबाई, गोवर्धन बाग मार्गे मारुती मंदिर हा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. मात्र हे वाडी रस्ते असल्याने अरुंद आहेत. एस, ट्रक आदी वाहनांसाठी हे रस्ते अडचणीचे ठरणार आहेत.
गुहागरकरांमागे पुलांचे शुक्लकाष्ठ
2019 मध्ये मोडकाआगरचा पुल वहातुकीस धोकादायक म्हणून बंद करण्यात आला. त्यामुळे गुहागर शहरासह पालशेत, असगोली आदी गावांमधील लोकांना 22 कि.मि.चा फटका बसला. आता 2021 च्या पावसाळ्यात पालशेत पुल बंद झाल्याने पुन्हा एकदा 15 गावांना गुहागरला येणे अडचणीचे ठरणार आहे. वहातुकीमधील अडथळ्यांचा परिणाम व्यापारासह पर्यटन उद्योगावरही होणार आहे.