चालक, मालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल
गुहागर, ता. 10 : शृंगारतळीतील चेकपोस्टवरच्या पोलीसांनी 9 जूनला सायंकाळी 6 खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली. यावेळी सर्व प्रवाश्यांच्या कोरोना तपासणी करण्यात आली. सुदैवाने सर्व चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. वाहन मालकासह चालक व सहाय्यक अशा 16 जणांवर साथरोग प्रतिबंधकात्मक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या कारवाईने अनेक प्रश्र्न निर्माण केले आहेत.
काय घडले ?
बुधवारी (ता. 9) सायंकाळी 7 ते 8.30 वा. या कालावधीत शृंगारतळीच्या चेकपोस्टवरील पोलीसांनी गुहागरमधुन मुंबईकडे जाणाऱ्या 6 प्रवासी बस थांबवल्या.
1 सायंकाळी 7. 10 वा. सुशांत कृष्णा शितप, जानवळे यांच्या मालकीची श्री ट्रॅव्हल्सची बस (क्र MH 04 FK 9594) अडकविण्यात आली. या बसमध्ये 15 प्रवासी होते. चालक दशरथ प्रकाश मोहिते, शृंगारतळी (30) क्लिनर सन्मान संजय कांबळे (22) रा. वेळंब पांगारी हे होते.
2 सायंकाळी 7. 30 वा. प्रणव विलास गडदे, हेदवी यांच्या मालकीची नवलाई ट्रॅव्हल्स बस (क्र MH 12 KQ 9092) अडकविण्यात आली. या बसमध्ये 25 प्रवासी होते. चालक अमित शांताराम कावणकर, अडूर (33) क्लिनर संदेश सुरेश निकम (23) रा. हेदवी हे होते.
3 सायंकाळी 7. 45 वा. विनायक रमेश दणदणे, अडूर यांच्या मालकीची सुंकाई ट्रॅव्हल्स बस (क्र MH 01 DR 0312) अडकविण्यात आली. या बसमध्ये 25 प्रवासी होते. चालक चालक सागर सुधाकर साळवी, रामपूर (31) क्लिनर लव मनोहर दसम (22) रा. अडूर हे होते.
4 सायंकाळी 8.00 वा. विक्रांत विश्र्वनाथ वानरकर, अडूर यांच्या मालकीची पिंपळेश्र्वर ट्रॅव्हल्स बस (क्र MH 09 EM 9630) अडकविण्यात आली. या बसमध्ये 27 प्रवासी होते. चालक सागर नरेश बागकर, कोतळूक (26) क्लिनर दिपक चंद्रकांत हळ्ये, अडूर (25) रा. अडूर हे होते.
5 सायंकाळी 8.10 वा. विक्रांत विश्र्वनाथ वानरकर, अडूर यांच्या मालकीची पिंपळेश्र्वर ट्रॅव्हल्स बस (क्र MH 08 A 9918) अडकविण्यात आली. या बसमध्ये 21 प्रवासी होते. चालक प्रितम मारुती गमरे, वरवेली (32) क्लिनर प्रथमेश प्रभाकर कापले (23) रा. अडूर हे होते.
6 सायंकाळी 8.20 वा. विक्रांत विश्र्वनाथ वानरकर, अडूर यांच्या मालकीची पिंपळेश्र्वर ट्रॅव्हल्स बस (क्र MH 08 E 9475) अडकविण्यात आली. या बसमध्ये 20 प्रवासी होते. चालक मयुरेश प्रदिप पडवळ (25) क्लिनर दिपक सहदेव देवळे (37) दोघेही रा. अडूर हे होते.
या सर्व वाहनांमध्ये 129 प्रवासी होते. पोलीसांनी चालकांकडे ई पास, प्रवाश्यांच्या आरटीपीसीआर अहवालांची मागणी केली. मात्र कोणाकडेच हे कागद उपलब्ध नव्हते. परंतू दंडात्मक कारवाई करुन गाड्या सोडायच्या की गुन्हे दाखल करायचे याबाबतचा निर्णय होण्यास विलंब झाला. अखेर नंतर पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम यांच्या उपस्थितीत ६ खासगी प्रवासी वाहनांचे चालक, सहाय्यक व मालक अशा 16 जणांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हे नोंदविण्यात आले. गुन्हे नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे पूर्ण होईपर्यंत जवळपास तासभर गेला.
प्रवाशांची झाली अँटीजेन टेस्ट
दरम्यानच्या काळात सर्व खासगी प्रवासी वाहनांमधल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय झाला. रात्री 12 वाजता चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची एक टीम शृंगारतळी येथील पेट्रोलपंपावर दाखल झाली. त्यांनी 2 प्रवासी वाहनामधील 37 प्रवाशांच्या अँटीजेन टेस्ट केल्या. उर्वरित ४ वाहनांपैकी 2 वाहने ग्रामीण रुग्णालय गुहागरमध्ये तर 2 वाहने कामथे उपजिल्हा रुग्णालयात अँटीजेन टेस्टसाठी पाठवण्यात आली. या चार वाहनांमधील प्रवाशांचे चाचणी अहवालही निगेटिव्ह आले. या चाचण्यांनंतर सर्व प्रवासी वाहने मुंबईकडे रवाना झाली.
लहान मुलांचे हाल
शृंगारतळी चेकपोस्टवरील पोलीसांनी खासगी प्रवासी बसमधील शेवटची बस रात्री 8.20 वा. अडकवली. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यामध्ये जवळपास दोन तासांचा अवधी गेला. गुन्हे दाखल करण्याचे कागदपत्र तयार करण्यात काही काळ लोटला. त्यानंतर अँटीजेन टेस्टमध्ये पुन्हा तासभराचा कालावधी गेला. त्यामुळे 5 तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी आणि त्याच्या सोबत असलेल्या चिमुकल्यांना तिष्ठत बसावे लागले. अनेक लहान मुले पेट्रोलपंपात पेंगुळलेल्या अवस्थेत होती.
कारवाईबाबत प्रश्र्नचिन्ह
रत्नागिरी जिल्ह्यात 2 जूनपासून 9 जून मध्यरात्रीपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. औषधे, दुध व कृषी सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. कोणताही व्यापार सुरु नव्हता. पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करत होते. मात्र याच कालावधीत काही खासगी प्रवासी वाहने विनासायास मुंबईपर्यंत जात होती. असे असताना 9 जुनला मध्यरात्री 12.00 वा. निर्बंध उठण्यापूर्वी काही तास 6 प्रवासी वाहनांवर कारवाई का करण्यात आली. ही कारवाई आधी का केली गेली नाही. निर्बंधांच्या काळात खासगी प्रवासी वाहनांना सूट का देण्यात आली. ही कारवाई गुहागर पोलीसांनी केली की गुहागर पोलीसांना वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. असे अनेक प्रश्र्न या कारवाईने निर्माण झाले आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. नातूंनी लॉकडाऊनमध्ये हप्ते वसुली वाढल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. हा आरोप सत्य असल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे याआधी कारवाई का झाली नाही याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे.
– सचिन ओक, तालुका सरचिटणीस, भाजप