गुहागर सभापतींचे पालकमंत्र्यांना निवेदन
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मौजे अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व व महसूल विभागाने शासनाच्या नावे होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांना निवेदन दिले आहे. Gopalgad Fort

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गुहागर तालुक्यामध्ये मौजे अंजनवेल येथे शिवकालीन गोपळगड नावाचा किल्ला आहे. सदर किल्ला ७/१२ सदरी काही तांत्रिक चुकांमुळे स्थानिक रहिवाशांच्या नावे दाखल झालेला असून त्या स्थानिकांची या ठिकाणी वहिवाट व आंबा बागायती या किल्ला क्षेत्रात आहेत. याबाबत गेले अनेक वर्ष सदरची मालकी हटविण्यासाठी येथील स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी मंडळी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक वृत्तपत्रे शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. Gopalgad Fort

याबाबतच्या कायदेशीर बाबी बर्यापैकी पूर्ण झालेल्या असून आत्ता पुरातत्व विभाग व महसूल विभाग यांनी अंतिम टप्प्यातली कार्यवाही करून प्रत्यक्षात किल्ला शासनाच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. तरी आपण या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन गोपाळगड किल्ला पुरातत्व व महसूल विभागाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करून राज्य संरक्षित स्मारक असणारी ही गोपाळ गडाची वास्तू खाजगी मालकीतून, वहिवाटीतून मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, ही विनंती शेवटी त्यांनी केली आहे. Gopalgad Fort
