महाराष्ट्र दिन : कोरोना संकटामुळे साधेपणाने साजरा


गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन सोहळा रत्नागिरी जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य व एकमेव शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हयात एकाच ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे निर्देश जारी केलेले होते. त्यामुळे आज शाळा शाळांमधुन होणारे महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम झाले नाहीत. एकेकाळी १ मे रोजी शाळांमधुन निकाल जाहीर व्हायचे. परीक्षा संपल्यावर १ मे रोजी ध्वजारोहणाला शाळेत येणे बंधनकारक होते. मात्र आज प्रथमच महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन शाळा व अन्य शासकीय कार्यालयात झाला नाही.


केवळ रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या सोहळ्याला आमदार राजन साळवी, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ईंदूराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार शशिकांत जाधव आदी उपस्थिती होते.

