अवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार
गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी.चे अंतर समुद्रातून पोहत पार करणार आहे. महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या निरिक्षणाखाली पार पडणार हा उपक्रम यशस्वी झाल्यास भविष्यात गुहागरच्या समुद्रावर जलतरण स्पर्धांचे आयोजनही होवू शकते.
(First time, a 13 years young swimmer Ashwin Sarwan Kumar will swim 20KM distance from Anjanvel to Asgoli in the sea of Guhagar.)
राज्य शासनाच्या सागर कन्या या विशेष पुरस्काराने सन्मानित तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या रुपाली रेपाळे यांच्या ॲकेडमीतील 13 वर्षांचा अश्र्विन सारवान कुमार हा विद्यार्थी गुहागरच्या समुद्रात पोहणार आहे. मुंबई पुण्यातील जलतरणपटु कायमच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील खुल्या समुद्रात पोहण्याचा सराव करतात. अनेकवेळा धरमतर खाडीमध्ये जलतरण स्पर्धा भरविण्यात येतात. मुंबईखेरीज सिंधुदूर्गमधील मालवण, वेंगुर्ला परिसरात नव्याने समुद्रात जलतरण स्पर्धांना सुरवात झाली आहे. अशाच पध्दतीने गुहागरच्या समुद्रात जलतरणाचे उपक्रम राबविले जाऊ शकतात का याचा प्रयोग जलतरणपटु रुपाली रेपाळे आज करत आहेत.
याबद्दल माहिती देताना सौ. रेपाळे म्हणाल्या की, कोरोनानंतर दोन ते तीन वेळा गुहागरला येण्याचा योग आला. त्यावेळी मला हा समुद्रकिनारा, येथील सौंदर्य, स्वच्छता आवडली. आपल्या अकादमीमधील एखाद्या खेळाडूंने या समुद्रात पोहावे अशी इच्छा होती. मात्र जलतरण संघटनेच्या परवानगी शिवाय अधिकृतरित्या कार्यक्रम घेता येत नाही. या वेळी महाराष्ट्र जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी मदत केली. ते स्वत: गुहागरमध्ये आले. अंजनवेल ते असगोली असा प्रवास आम्ही केला. त्यानंतर राज्य संघटनेने अंजनवेल ते असगोली या खुल्या समुद्र मार्गे जलतरणाला परवानगी दिली. चिपळूणचे मल्लेश लकेश्री, गुहागरमधील बापु गोयथळे, असगोलीचे श्रीधर नाटेकर या तिघांनी जलतरणासाठी आवश्यक नौका, निवासाची व्यवस्था आदी मदत केली. म्हणुनच एकदम नव्या समुद्रमार्गावर जलतरणासाठी अश्र्वीन उतरणार आहे. अश्र्वीन कुमार हा आठव्या वर्षापासून जलतरण करत आहे. त्यांने राज्यस्तरीय सनक्रॉक ते गेट वे ऑफ इंडिया या जलतरण स्पर्धेत द्वीतीय क्रमांक मिळवला आहे. वेंगुर्ला येथील खुली स्पर्धा त्याने पूर्ण केली आहे. वयाच्या 12 वर्षी उरण ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर त्याने पार केले आहे. आज प्रथमच 20 किमीचे अंतर अश्र्वीनकुमार पार करणार आहे.
जलतरण यशस्वी झाल्यास अनेक आयोजक स्पर्धा भरवतील
शुक्रवारी होणाऱ्या जलतरणाबाबत महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे सेक्रेटरी व आजच्या जलतरणाचे निरीक्षक संतोष पाटील केवल अश्विनच्या पोहण्याचे निरिक्षण करणार नाही तर मार्गात येणारे अडथळे कोणते, कोणत्या भागात पोहोण्याचा वेग कमी होतो, वाऱ्यांचा वेग सतत बदलता असतो का, त्याचा पोहण्याच्या गतीवर किती परिणाम होतो. अशा स्पर्धेच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांच्या नोंदी ते यावेळी करणार आहेत. गुहागर न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, आजच्या समुद्रमार्गावरील जलतरण यशस्वी रित्या पार पडले तर संपूर्ण राज्यात हा संदेश जाईल. त्यातून अन्य जलतरण प्रशिक्षण आपल्या प्रशिक्षणार्थींना येथे सरावासाठी घेऊन येतील. अनेक आयोजक स्पर्धा भरवतील. त्यामुळे शुक्रवारचे जलतरण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
वेळनिश्चितीपूर्वी केला अभ्यास
अश्र्वीनचे प्रशिक्षक अनिऋध्द महाडिक म्हणाले की, हा मार्ग ठरवतात येथे भरती आहोटीच्या वेळी उसळणाऱ्या लाटा, बदलणारे प्रवाह, वाऱ्याचा वेग व दिशा, पाण्याचे तापमान, हवेतील तापमान अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आम्ही केला. त्यानंतरच हा मार्ग आणि वेळ आम्ही निश्चित केली आहे.
ही बातमी ज्या मुलाखतीवरुन केली ती संपूर्ण मुलाखत इथे पहा