आत्माराम महाराजांचे निधनाने संप्रदाय झाला पोरका
नामसाधनेचे महात्म्य सामान्य जनतेला पटवून देऊन भक्तिमार्गाने समाजातील समस्यांचे निराकरण करणारे आत्माराम महाराज सोलकर (बाबा) शुक्रवारी (ता. 28 मे 2021) वैकुंठवासी झाले. त्याच्या निधनाने गुहागर तालुक्यातील वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यापेक्षा भगवंताचे श्रेष्ठत्व मान्य करून त्याच्या चरणी लीन व्हा तोच तुमची संकटे दूर करेल. हे त्यांचे तत्त्व. तरुणपणी वारकरी संप्रदायाची कास धरल्यावर संपूर्ण आयुष्य हरिनामाच्या प्रसारासाठी वाहून घेतल होतं. सर्वसामान्यांच जिणं सुखकर करण्यासाठी झिजणारे, हरिनामाचे वारकरी बाबा वैकुंठवासी झाले. चिखली येथे शोकाकुल वातावरणात अग्नीसंस्कार करण्यात आले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आत्माराम महाराज वडिलांसोबत शेती, गवंडी काम करत असतं. वयाच्या 16 व्या वर्षी वडिलांनी आत्माराम महाराजांना तुकारामांची गाथा वाचनासाठी दिली. आणि योगायोगाने याच काळात याच काळात एका कीर्तनात सुवरेमहाराजांची भेट झाली. त्यांच्या परीसस्पर्शाने आत्माराम सोलकर यांना भगवंत भक्तीसाठी नाम साधनेचा मार्ग सापडला. सुवरे महाराजांनी गुहागरात सुरू केलेल्या वारकरी संप्रदायाचे उत्तराधिकारी झाल्यावर आत्माराम महाराज अशी त्यांची ओळख बनली. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून बाबांनी चिखलीत हरिनाम सप्ताह सुरू केला. काही वर्ष बाबा कोकण दिंडीचे विणेकरी होते. सुवरे महाराजांनी गुहागर तालुक्यात सुरू केलेले काम पुढे नेण्यासाठी त्यांनी व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ सुरू केले.
वारकरी कोणावरही अवलंबून राहू नयेत म्हणून बाबांनी मेहनत घेतली. गावोगावी हरिनाम सप्ताह करायचा म्हणजे प्रवचनकार, कीर्तनकार लागतात. हे लक्षात घेवून त्यांनी आपला मुलगा प्रकाश याला वारकरी संप्रदायाची परंपरा शिकण्यासाठी आळंदीत पाठवले. ते शिकुन आल्यावर प्रकाश महाराजांना वारकरी परंपरेप्रमाणे प्रशिक्षण देण्यास सांगितले. प्रकाश सोलकरांचे तंत्र आणि बाबांचे मार्गदर्शन यातून गुहागर तालुक्यात प्रभाकर दळवी, नंदुअप्पा जाधव, वसंत देऊडकर, विजय माळी, भार्गवअप्पा विचारे, जोशीकाका, नाना पाटणकर, बबन कुंभार, चंद्रकांत चांदोरकर, शांताराम कळंबाटे, गिजे गुरुजी, रमेश बारगोडे, कमळाकर वणगे हरिश्चंद्र पारदळे या मंडळींना किर्तनासाठी तयार केले. टाळ कसा वाजवायचा, पखवाज कसा वाजवायचा याचे प्रशिक्षण दिले. चिखलीला व्याडेश्र्वर दिंडी सेवा मंडळाचे केंद्रस्थान विकसीत केले. तेथे हरिनाम सप्ताह सुरु केला. या हरिनाम सप्ताहाला तालुक्यातील सर्व वारकऱ्यांना जोडले. आज चिखलीतील व्याडेश्र्वर दिंडीच्या मठात होणाऱ्या हरिनाम सप्हाला गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील 41 गावे सेवेसाठी येऊ लागली.
बाबा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला नामसाधनेचा मार्ग दाखवायचे. चिखलीतील सप्ताहाला येण्याचा आग्रह करायचे. नियमित हरिभक्तीत रममाण होणाऱ्याच्या गळात माळ घालायचे आणि गावात गावात हरिनाम सप्ताह करण्याचा आग्रह धरायचे. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे गुहागर तालुक्यातील 18 गावात हरिनाम सप्ताह सुरू झालेत. अन्य 10 – 12 गावात आषाढी कार्तिकीला हरिपाठ होऊ लागला. बाबांनी दाखवलेल्या भक्ती मार्गावरुन चालणाऱ्या अनेकांची व्यसने सुटली. व्यसनाधिनतेमुळे निर्माण झालेले तंटे, जमीनींच्या वादांवरुन होणारी भांडणे, खोट्या प्रतिष्ठेतून वाडीत तयार झालेले दोन गट, दोन भजनी मंडळे, त्यांच्यातील स्पर्धा या सर्व गोष्टी बाबांनी हरिनामाच्या साह्याने नष्ट केल्या. वाड्या, गाव एकत्र आले. साधनेतून समाज कसा सुधारतो त्याचा प्रत्यय आज गुहागर तालुक्यातील अनेक गावे घेत आहेत.
वारकरी संप्रदायात पंढरपुरला स्वमालकीचा वाडा असला पाहिजे असा ध्यास बाबांनी घेतला होता. त्यासाठी लाखो रुपयांची आवश्यकता होती. सर्वसामान्य वारकऱ्यांनी केवळ बाबांना दिलेल्या शब्दाखातर दागिने गहाण ठेवून, जमीन विकून पैसे दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. एका महिलेने तर स्वत:च मंगळसुत्रही बाबांच्या हातात ठेवले होते. बाबांवर इतकी टोकाची श्रध्दा असलेली अनेक माणसं आहेत. पण त्यांनी आपल्या साधनेचे, सिध्दीचे कोणतेही अवंडबर माजवले नाही. बाबांना महाराज म्हणून संबोधलेलेही आवडत नसे. कर्तृत्व सांगण्यापेक्षा हरिनामाचे कर्तव्य सांगणाऱ्या बाबांचा हरिपाठ आणि एकादशीची पंढरपूर वारी कधी चुकली नाही. असा हा निष्काम कर्मयोगी, नामसाधनेचा आग्रह धरणारा समाज सुधारक विठ्ठलच्या भेटीसाठी चैतन्य विश्र्वात विलीन झाला आहे.