कोकणातील प्रत्येक गावाच मुंबईत एक मंडळ असतं. नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईच्या विशाल नगरीत पैपैशासाठी धावणाऱ्या मंडळींनी कधी काळी एकत्र येवून या मंडळांची स्थापना केली. अडीअडचणीच्या काळात आपली विचारपूस करणार कोणीतरी आहे हा आधार चाकरमान्यांना द्यावा. हा मंडळाच्या स्थापनेमागचा हेतू असावा. हे मंडळ टिकवणारी पिढी बदलत गेली तसा हा हेतू आणखी उदात्त झाला. मुंबईकरांबरोबर गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनाही हे मंडळ आधार वाटू लागलं. विकासाची गंगा या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वाडीवाडीत पोचली. आता ही मंडळ इतकी सक्षम होवू लागली आहेत की आपत्तीच्या काळात अन्य लोकांना मदत करुन लागली आहेत. याचा आदर्शच धोपावे ग्रामविकास मंडळांने सर्वांसमोर ठेवला आहे.


22 जूनला चिपळूण परिसरात भिषण महापूर आला आणि हजारों जीवन उध्वस्थ करुन गेला. महापूर ओसरला तर प्रत्येक जण मदतीचा हात घेवून चिपळूण परिसरात धावला. कोरानोमधील निर्बंधाच्या पार्श्र्वभुमीवरही अनेक सामान्य जनांनी आपल्या बचतीमधील काही रक्कम खर्ची घातली. प्रत्येक संस्था, तरुण मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आदी हजारो हातांनी आपल्या कुवतीप्रमाणे मदत केली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, आदी शहरातील विविध संस्थांनी सहकार्याच्या भावनेतून चिपळूणकडे धाव घेतली.


धोपावे ग्रामविकास मंडळ अशाच अनेक संस्थांमधील एक असले तरी त्याचं एक वेगळेपणं आहे. धोपावेसारख्या गुहागर तालुक्यातील दाभोळ खाडी नजिक वसलेल्या एका छोट्या गावाचं हे मंडळ. या मंडळाच्या नावातच ग्रामविकास आहे. मुंबईत नोकरी उद्योग करणारी मंडळी हे मंडळ आपल्या घामाच्या पैशातून चालवतात. पदरमोड करुन मंडळाच्या तिजोरीत जमा होणारी रक्कम गावाच्या विकासाकरीता वापरली जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धोपावे ग्रामस्थांनी या मंडळाने हजारो रुपये खर्च केले. आशा, अंगणवाडी सेविकांपासून शिमगोत्सवात पालखीसोबत फिरणाऱ्या गावकऱ्यांना कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड आदी विविध प्रकारचे साहित्य दिले. पुढे महाराष्ट्रात निर्बंध लागु झाले. गावकऱ्यापेक्षा मुंबईत रहाणाऱ्यांची आर्थिक गणिते अधिक बिघडली. पहिल्या टाळेबंदीत रोजगार गमावला होताच. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली.


या पार्श्र्वभुमीवर पुन्हा एकदा पदरमोड करुन धोपावे ग्रामविकास मंडळाने महापूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. म्हणूनच या मंडळाचे अधिक कौतुक करावेसे वाटते. महापूरानंतर तातडीने मदतीचा ओघ सुरु झाला तेव्हा मंडळाचे कार्यकर्ते शांत होते. कशा स्वरुपात मदत केली पाहिजे, कोणाला मदत केली पाहिजे, खरे गरजू कोण आहेत अशी माहिती मिळवण्याचे काम धोपावे ग्रामविकास मंडळाचे चिपळूणमधील ग्रामस्थ सुभाष पालशेतकर करत होते. खरा गरजू आणि त्याला आवश्यक योग्य साहित्य याची जमवाजमव मुंबईत सुरु होती.


अखेर मुहूर्त निश्चित झाला. भारताच्या स्वातंत्र्यदिनी धोपावे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण, सरचिटणीस अनिल भुवड, मध्यवर्ती समितीचे सदस्य मनोज पवार, चिपळूण मधील ग्रामस्थ सुभाष पावसकर यांनी दळवटणे गावातील गणेशवाडी, बौध्दवाडी, बागवाडी, वडदेवाडी आणि चिपळूण पेठमाप येथे ब्लॅंकेट,चादर, टॉवेल, चटई, साडी, पाणी भरायचे मग आणि पाण्याची बाटली इत्यादी साहित्य गरजू पूरग्रस्तांना दिले.
गावाच्या विकासासाठी कटिबध्द असलेल्या धोपावे ग्रामविकास मंडळाने संकटकाळात आपत्तीमधील ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामविकासाबरोबरच सर्व समाजासोबत उभे रहाण्याची बांधिलकी जपणारा या मंडळाचा बंधुभावाचा संदेश नक्कीच नवी दिशा देणारा आहे.