जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५३८ घरांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण
गुहागर, ता. 27 : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला जिल्ह्यात मोठे यश मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात घरोघरी कार्यात्मक नळजोडणी (एफएचटीसी) देण्याचे काम ८६.७० टक्के पूर्ण झाले आहे. Guhagar Tops ‘Jal Jeevan Mission’!
या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४ लाख ४८ हजार १६१ नळजोडण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या निर्धारित उद्दिष्टांपैकी प्रत्यक्षात ३ लाख ८८ हजार ५३८ घरांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५९ हजार ६२३ नळजोडण्यांचे काम सध्या वेगाने सुरू असून, लवकरच जिल्हा १०० टक्के नळजोडणीचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. तालुकानिहाय कामगिरीचा विचार केल्यास, गुहागर तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. गुहागरमध्ये निश्चित केलेल्या ४२ हजार ५६१ उद्दिष्टांपैकी ४० हजार ३०६ घरांमध्ये (९४.७० टक्के) नळजोडण्या पूर्ण झाल्या असून, केवळ २ हजार २५५ कामे शिल्लक आहेत. Guhagar Tops ‘Jal Jeevan Mission’!
त्या पाठोपाठ चिपळूण तालुक्याने ९३.१५ टक्के (६४ हजार ६४४ पूर्ण), दापोली तालुक्याने ९२.४८ टक्के (४५ हजार ४३१ पूर्ण) आणि मंडणगड तालुक्याने ९०.७४ टक्के (१८ हजार २६५ पूर्ण) प्रगती करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. तसेच लांजा तालुक्यात ८८.६७ टक्के (२३,२७१ पूर्ण), रत्नागिरी तालुक्यात ८५.८६ टक्के (५९,६०७ पूर्ण), संगमेश्वर तालुक्यात ८१.७७ टक्के (५१,४८१ पूर्ण), राजापूर तालुक्यात ८१.१७ टक्के (४०,९६० पूर्ण) आणि खेड तालुक्यात ७७.०४ टक्के (४४,५७३ पूर्ण) नळजोडण्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या मिशनची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. Guhagar Tops ‘Jal Jeevan Mission’!
