डॉ. उदय निरगुडकर; पुस्तक प्रकाशन सोहळा; ५०० मान्यवरांची उपस्थिती
रत्नागिरी, ता. 19 : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांच्या ३५ वर्षांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी मांडली आहे. सहकार क्षेत्रातील समस्या आणि त्यावर काढलेले मार्ग यांचा अनुभवसिद्ध ऊहापोह या पुस्तकात असल्याने हे एक आदर्श ‘टेक्स्टबुक’ ठरू शकते. भारताचा खरा अंत्योदय सहकारातूनच होऊ शकतो. त्यामुळे हे पुस्तक विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित व्हावे. मुंबईत स्वप्न घेऊन जाणाऱ्या युवकांनी कोकणात राहून कार्य करण्यासाठी हे पुस्तक रोल मॉडेल ठरावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’
स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास सुमारे ५०० वाचक, बँकर्स व मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे, आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी सुहास विद्वांस, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू उपस्थित होते. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’

डॉ. निरगुडकर म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रॅक्टिकल मार्गदर्शक ठरेल. अभ्यासक्रमाबाहेरील अनेक विषय यात मांडले आहेत. ‘आधी केले आणि मग सांगितले’ या भूमिकेतून लिहिलेले हे अनुभवसिद्ध पुस्तक आहे. नीतिमान माणसे कशी गोळा करावीत आणि त्यांना केवळ पगार देऊन नव्हे तर संस्थेशी बांधिल ठेवून कसे टिकवून ठेवावे, याचे मार्गदर्शन यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची मक्तेदारी होती; मात्र दीपक पटवर्धन यांनी कोकणात सहकाराची भक्कम पायाभरणी केली. नेतृत्वातील नीतिमत्ता त्यांनी जपली आहे. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’
ते पुढे म्हणाले, जगात चार प्रकारची माणसे असतात—त्रस्त, व्यस्त, सुस्त आणि स्वस्त. मात्र दीपक पटवर्धन हे त्यापेक्षा वेगळे असून समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणाऱ्या ‘मस्त’ प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. समाजाच्या गरजा भागवण्यासाठी सहकार असतो. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून अपप्रवृत्तीला आळा बसणे आवश्यक आहे. ग्रामीण भारतात सहकार आणि राजकारणातील अंतर कमी झाले पाहिजे; कारण सभासद हा संस्थेचा खरा मालक असतो. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’

सहकारातून देवराई जतन करा
कोकणात वाढत्या वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके होत आहेत. यशस्वी सहकाराच्या माध्यमातून देवराई उभी करण्याची संधी आहे, असे मत डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळकांनी जशी गर्जना केली होती, तशीच आज अॅड. पटवर्धन यांनी “सहकार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी प्रेरणादायी भूमिका मांडल्याचेही त्यांनी सांगितले. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’
पत्नीची मोलाची साथ
सहकार म्हणजे ‘स्वाहाकार’ नव्हे. अनेकदा अंधारात लढावे लागते; मात्र या प्रवासात अॅड. पटवर्धन यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या पत्नी अरुणाताई यांनी दिलेली साथही तितकीच मोलाची असल्याचे डॉ. निरगुडकर यांनी आवर्जून नमूद केले. यश आणि प्रसिद्धी कोणत्या मार्गाने मिळवली जाते हे महत्त्वाचे असून पटवर्धन यांनी नैतिकतेचे भान कायम ठेवले आहे. राजकारणात रमण्यापेक्षा समाजासाठी केलेले त्यांचे कार्य अधिक चिरस्थायी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संतोष थेराडे यांनी अॅड. पटवर्धन यांच्या संस्थात्मक कार्याचा आढावा घेऊन डॉ. निरगुडकर यांचा परिचय करून दिला आणि मान्यवरांचा सत्कार केला. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’
संघर्षातून उभा राहिलेला प्रवास
श्री. पटवर्धन यांच्या सूनबाई सौ. अंकिता वैभव पटवर्धन यांनी सांगितले की, बाबांच्या आत्मकथनाचा हा सोहळा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. संघर्षातून यश मिळवत इतरांना प्रेरणा देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे.
भावनांचा विचार करणारे नेतृत्व
सुहास विद्वांस म्हणाले की, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा केवळ दहा हजार रुपयांपासून सुरू झालेला प्रवास आज सातशे कोटींपर्यंत पोहोचला आहे. कोकणात सहकाराची पायाभरणी करणारे दीपक पटवर्धन हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहे. संस्थेत सोनेतारणासाठी स्वतंत्र कक्ष ठेवणे हेही त्यांचे वेगळेपण आहे. ठेवीदारांच्या पैशाची काळजी घेणारे असे नेतृत्व दुर्मिळ असते. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’

‘३५ वर्षांचा प्रवास शब्दबद्ध’
पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, आजचा कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. सहकार आणि समाजजीवनातील माझा ३५ वर्षांचा प्रवास या पुस्तकातून शब्दबद्ध झाला आहे. व्हॉट्सअॅपवरून संस्थात्मक लेखन करत असताना मित्रांनी पुस्तक लिहिण्याचा आग्रह धरला. अलिकडेच निधन झालेल्या संस्थेच्या माजी व्यवस्थापिका अमृता सोमण यांनीही पुस्तक लिहिण्याची सूचना केली होती. त्यातूनच हे पुस्तक साकार झाले. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’
ते पुढे म्हणाले, दहा हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू झालेल्या या प्रवासाने आज सातशे कोटींचा टप्पा गाठला आहे. ३०० सभासदांपासून सुरू झालेली संस्था आज ४९ हजार सभासदांपर्यंत पोहोचली आहे. सहकार क्षेत्रात मोठ्या संधी असून उद्योजकतेसाठी व्यापक नेटवर्क उपलब्ध आहे. कोकणातील युवकांनी सहकाराकडे नव्या दृष्टीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आईचे पाठबळ, वडिलांचा आधार
लहानपणी शिक्षिका असलेल्या आईकडून ध्रुवबाळाची गोष्ट ऐकताना चिकाटी आणि ध्येयाची प्रेरणा मिळाली. आईचे पाठबळ आणि वडील अण्णांचा आधार यामुळेच आयुष्यात अनेक संस्थांमध्ये अढळ स्थान मिळवता आले, असेही पटवर्धन यांनी सांगितले. Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’
