समुद्र खडकात मासे पकडणे बेतले जीवावर
गुहागर, ता. 22 : दोन दिवस वेगवेगळ्या प्रकारच मासे मिळाले म्हणून सलग तिसऱ्या दिवशी मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा घात झाला. पाचमाड येथील खडकाळ परिसरात मासे मारताना तोल जावून एकजण समुद्रात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा ही समुद्रात पडला. लाटांमुळे येथील खडकांवर आपटून दोघेही जखमी झाले. अखेर दोघांचे मृतदेह मंगळवारी (ता. 22) गुहागरच्या समुद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले.
ही दुर्दैवी कथा आहे आरेगावातील सिद्धांत संदेश साटले (वय 23) रहाणार कलमवाडी आणि प्रतीक किसन नावले (वय 25) रहाणार नागदेवाडी या दोन तरुणांची. गुहागर बाग, पाचमाड ते रानवीच्या डोंगराखालील खडकात या दिवसांत समुद्रातील वेगवेगळ्या प्रजातींचे मासे मिळतात. या चवीष्ट माशांना किंमतही खूप मिळते. त्यामुळे या दिवसांत अनेकजण बाग ते रानवी परिसरातील समुद्रकिनाऱ्यानजिकच्या खडकाळ भागात मासे पकडायला जातात. गुहागर तालुक्यातील आरेगावातील सिध्दांत साटले आणि प्रतीक नावले हे दोन तरुण देखील गेले तीन दिवस याच पध्दतीने मासेमारीसाठी जात होते. सोमवारी (ता. 21 जून) मासे पकडण्यासाठी गेले. सोमवारी सायंकाळपर्यंत ते परत आले नाहीत म्हणून दोघांचे मित्र शोधण्यासाठी बाहेर पडले. बाग परिसरातील पाचमाड समुद्रकिनारी सुरुच्या झाडाखाली दुचाकी उभी करुन सिध्दांत आणि प्रतिक खडकात गेले होते. जाताना आपले मोबाईल दुचाकीमध्ये ठेवून गेले होते. शोध घेणारी मंडळी सायंकाळी 5 च्या सुमारास खडकापर्यंत जावून गेली. भरतीच्या वेळी ते दोघे जीवंत सापडतील अशी आशा होती. म्हणून रात्री 12.30 पर्यंत शोध सुरु होता. पण दोघांचा काहीच पत्ता लागला नाही. पुन्हा मंगळवारी (ता. 22) पहाटे 5 वाजता शोधमोहिमेला सुरवात झाली. रात्री उशिरा हे दोघे खडपात आले असतील या वेड्या आशेने काही मित्रांनी खडपात शोध घेतला. पण हाती काहीच लागले नाही. नको तो अपघात घडल्याचे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास गुहागर पोलीस ठाण्यात सिध्दांत व प्रतिक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
मंगळवारी दुपारी 3 च्या दरम्यान गुहागर वरचापाट मोहल्ला येथील समुद्रकिनाऱ्यावर सिध्दांतचा मृतदेह सापडला. तर त्याच दरम्यान गुहागर बाजारपेठ परिसरात (गुहागर बीच) प्रतिकचा मृतदेह सापडला. दोघांच्या डोक्याला तसेच शरिरावर जखमा होत्या. त्यावरुन या दोघांनी खडकांमधुन समुद्रातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे लक्षात येत होते. दुर्दैवाने लाटाच्या माऱ्यामुळे समुद्रातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा खडकांवर आपटले होते. याच लढाईत त्याच्या जीवनाची अखेर झाली असावी. दोन्ही मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पंचविशीतील दोन तरुण गमावल्याने आरेगावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आनंदराव पवार अधिक तपास करत आहेत.