गुहागर, ता. 29 : कोकणातील सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम खातू यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 28 मे) पहाटे 4 वा. निधन झाले. मृत्यू समयी त्या 87 वर्षांच्या होत्या.
विजया खातू या शांताराम उर्फ दादा खातू यांच्या पत्नी. गुहागर तालुक्यातील पाहिले भात, मसाला व अन्य दालने दळून देण्याची गिरणी त्यांची होती. स्व. दादा हे एक उत्तम कवी आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या गिरणी मध्ये आजही त्यांनी लिहिलेल्या कविता पहावयास मिळतात. काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. पत्नी विजया खातू यांनी त्यांना चांगली साथ दिली होती. मुलांचे चांगले शिक्षण पूर्ण केले. त्यांना 2 मुलगे आणि 4 मुली आहेत. आज त्यांची मुले सुद्धा व्यवसायात प्रगती करत आहेत. आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे खातू मसाले उद्योग समूहाचे मालक शालिग्राम खातू व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू यांनी आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला आहे.
विजया खातू या गेली 3 महिन्यांपासून आजारी होत्या. गुरुवारी पहाटे ४ वाजता निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुहागर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दहावे कार्य शहरातील बँक ऑफ इंडिया समोरील निवासस्थानी सकाळी 11 वाजता होणार आहेत.
(श्रीम. विजया खातूंबाबत त्यांची मुलगी सौ. अनुराधा नारकर यांनी लिहिलेले मनोगत )
आई माझे दैवत
जीच्याशिवाय जीवन सुरू होत नाही. जीच्या वात्सल्याची ओंजळ कधी रिती होत नाही. अशी प्रत्येकाच्या जीवनाची नायिका म्हणजे आई. नऊ महिने पोटात वाढवलेल्या गोळ्याला मुर्तीकाराप्रमाणे आकार देण्याचं, घडवण्याचं, संस्कारीत करण्याच काम ती करत असते. वडिलांनी जगाला सामोर कसं जायचं, यशस्वी कसं व्हायचे ते शिकवल. तर आईने माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं.
– सौ. अनुराधा नारकर, कडवई
वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुनसच्या दळींची कलावती गुहागरच्या शांताराम खातुंची विजया होऊन गुहागरला आली ती एकत्र कुटुंबातील मोठी सुन म्हणून. दोन दीर, चार नणंदा, सासू सासरे असा मोठा संसार आमच्या आईने सांभाळायला सुरवात केली. काही कारणांमुळे या एकत्र कुटुंबावर विभक्त होण्याची वेळ आली. वडीलांच्या वाट्याला 1 पीठ गिरणी आली. जेमतेम कुटुंबाचे भागायचे. त्यावेळी आई काटकसरीने घर चालवत होती. गिरणीला सोमवारी सुट्टी असल्याने शाळेतून आल्यावर आम्ही सर्वजण समुद्रावर जात असू. तोच काय तो आईसाठी विरंगुळ्याचा क्षण होता. गिरणीचा व्याप वाढु लागल्यावर दादा सकाळी 7 वाजता गिरणीत जाऊ लागले. त्यांना नाश्ता द्यायचा. मग आम्हा मुलांचे आवरायचे. आम्ही शाळेत गेलो की, दुपारचे जेवण बनवून दादांना गिरणीतच डबा नेऊन द्यायचा. सायंकाळी शाळेतून आम्ही आलो की तांदुळ भाजून केलेल्या पीठाचा लाडू मिळायचा. रात्री गिरणीतून दादा आल्यावर जेवण. असा आईचा दिनक्रम अनेक वर्ष सुरू होता.
आई सुर्यादयापूर्वीच उठायची. धार्मिक वृत्तीची आई अनेक व्रत वैकल्ये, उपास करत असे. देवाच्या प्रार्थनेने तिचा दिवस सुरू होत असे व रात्री देवाला नमस्कार केल्याशिवाय ती कधीच झोपत नसे. स्वाभाविकपणे आम्हा मुलांमध्येही हा गुण आला.
भाद्रपदात आजोबांच्या घरी गणेशोत्सवासाठी 10 राहीलेच पाहिजे असा तिचा आग्रह असे. त्यातून नाती टिकविण्याचा, वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करण्याचा संस्कारही तिनेच केला.नात्यातल्या प्रत्येकाचं तिला कौतुक होतं. कोणाच्याही दुर्गुणांचा पाढा तिनं कधी वाचला नाही. ती म्हणायची प्रत्येकातले चांगले गुण तेव्हढेच आपण बघावेत, बाकी सर्व सोडून द्यावे. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून कळत नकळतसुद्धा दुसऱ्याच मन कधी दुखवू नये. हा संस्कार तिनं आमच्यासह नातवंडांमध्येही रुजवला. तिच्या संस्कारांतून, तिच्या वागण्या-बोलण्यांतून, तिच्या कृतितून, तिच्या संयमातून आलेल्या संकटांवर, अडचणींवर धैर्याने, शांतपणे, मनाचा तोल ढळू न देता, संयमाने कशी मात करायची हे आम्ही शिकलो. सासरी गेल्यावर या संस्कारांचे महत्त्व खऱ्या अर्थाने उमगले.