• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोना संकटातील तालुकावासीयांचा आधार संपला

by Mayuresh Patnakar
May 26, 2021
in Old News
16 0
1
कोरोना संकटातील तालुकावासीयांचा आधार संपला
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळीतील कोविड रुग्णालय बंद, पुढे काय…….

नेहमी ज्यांच्याकडे जातो अशा डॉक्टरांनी सुरु केलेले कोविड रुग्णालय असल्याने गुहागर तालुकावासीयांना एक मोठा आधार होता. मात्र तेच रुग्णालय बंद पडल्याने संचालन करणाऱ्या डॉक्टरांबरोबरच गुहागर तालुक्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटाने एका अराजकीय चळवळीचा आर्थिक बळी गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे नेमकं कसं घडलं याची सविस्तर माहिती या दिर्घ लेखात आहे. शिवाय काही प्रश्र्नही आहेत. हा लेख केवळ वाचण्यासाठी नाही तर आपली मते समोर यावीत म्हणून आहे. आपण सर्वांनी व्यक्त होवून पुढे काय ? या प्रश्र्नांचे उत्तर शोधुया…
थोडी पार्श्र्वभुमी
मुळामध्ये शृंगारतळीला सप्टेंबर 2020 मध्ये तालुक्यातील 13 डॉक्टरांनी एकत्र येवून रेनबोमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले होते. वेळणेश्र्वरला असलेल्या कोविड केअर सेंटरपेक्षा थोड्या अधिक सुविधा त्यावेळी या डॉक्टरांनी देवू केल्या होत्या. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन लागलाच तर एका छोट्या उपकरणाद्वारे देण्याची व्यवस्था होती. थोडे उपचार डॉक्टर करणार होते. त्यातूनही रुग्ण अत्यवस्थ झालाच तर त्याला अन्यत्र हलविण्यात येणार होते. म्हणजे येथे अत्यंत प्राथमिक उपचारांची व्यवस्था डॉक्टरांनी केली होती. ही व्यवस्था सांभाळणे जी 13 समुहातील डॉक्टरांच्या हातात होते.
दुसऱ्या लाटेची सुरवात
वास्तविक पहिली लाट संपल्यानंतर ज्याप्रमाणे जनता निष्काळजी झाली त्याप्रमाणे शासनाचा कारभारही कोरोनाच्या संदर्भात संथ झाला. पहिल्या लाटेतच अपेक्षा होती शासन पायाभूत सुविधांची निर्मिती करेल. परंतू दुसऱ्या लाटेने राज्यात परिस्थिती गंभीर बनली तेव्हा गुहागरमधील यंत्रणा सुविधांच्या निर्मितीसाठी धावू लागल्या. तेव्हा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. हे सत्य असेल तरी येणाऱ्या लाटेची कल्पना शासनस्तरावर आली होती. म्हणून गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेले १० बेडचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे, वेळणेश्र्वरला पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आणि आणखी एक कोविड रुग्णालय उभे करण्याच्या सूचना मिळाल्या. त्याप्रमाणे कार्यवाही झाली.
कोरोनाचे संकट गडद बनले
शिमगोत्सवानंतर दोन आठवड्यांनी गुहागरमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरु झाले. पण लोकांचा निष्काळजीपणा गेला नव्हता. कोरोना झाला तरी बरे होते हा अतिआत्मविश्र्वास होता. या काळात डॉक्टरांच्या जी 13 समुहाने सप्टेंबर 2020 प्रमाणे सर्व व्यवस्था केली होती. रुग्ण येत होते, उपचार सुरु होते. आठवडाभरानंतर येणारे रुग्ण थोडासा ताप अंगावर काढून धाप लागल्यावर उपचारासाठी धावू लागणारे होते. ही संख्या रत्नागिरी जिल्ह्यात इतक्या झपाट्याने वाढली की ऑक्सिजन बेड कमी पडू लागले. गुहागर तालुक्यातील रुग्णाला जिल्ह्यात अन्यत्र बेड उपलब्ध होत नव्हते. एखाद्या ठिकाणी बेड आहे म्हणून प्रवास करुन पोचेपर्यंत ऑक्सिजन बेडवर अन्य रुग्ण असायचा. त्यामुळे शृंगारतळी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणारे सर्वच रुग्ण ऑक्सिजनची पातळी कमी झालेले असायचे. त्यामुळे ह्या प्राथमिक स्तरावरील उपचारांसाठी सुरु केलेले रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटर आदी सुविधांची गरज निर्माण झाली. गुहागरमधील रुग्णांची सेवा करता यावी, अन्यत्र बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हकनाक बळी जाऊ नयेत  या निस्वार्थी हेतून जी 13 डॉक्टरांच्या समुहाने तातडीने कोविड केअर सेंटरचे रुपांतर आयसीयू युनिटमध्ये करण्याचा निर्णय घेतला.
अमर्याद खर्च
आयसीयू युनिट उभे करण्याचा निर्णय व्यावसायिक हेतूंनी नव्हे तर आपल्या नेहमीच्या, तालुक्यातील रुग्णांची फरफट होवू नये म्हणून घेण्यात आला होता. कारण प्रकृती बिघडल्यावर रुग्ण प्रथम आपल्या हक्काच्या डॉक्टरांकडे जात होते. तेथे ऑक्सिजनची पातळी कमी झालेली लक्षात आल्यावर डॉक्टरांनाच विचारत होते आता काय करायचं. म्हणून आयसीयू रुग्णालय उभे करण्याचा निर्णय झाला. एम. डी. फिजिशयन, अन्य डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय या सर्वांची व्यवस्था करण्यात आली. रेनबो रुग्णालयाच्या तळाशी 18 आयसीयु बेडचा विभाग विकसीत करण्यात आला. तेथे एसी बसविण्यात आले. ऑक्सिजनची पाईपलाईन फिरविण्यात आली. बाय पॅक मशीन, मॉनिटर अशी उपकरणे आणली गेली. याशिवाय पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर या गोष्टींसाठीचा खर्चही वाढला. या सर्व गोष्टी खरेदी करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की, दुसऱ्या लाटेत वैद्यकिय साहित्याच्या किंमती चौपटीने वाढल्या आहेत. ऑक्सिजन सिलेंडर पैसे दिल्याशिवाय भरुन मिळत नव्हते.
आयसीयु युनिटसह शृंगारतळी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांची गुंतवणूक 20 लाखापेक्षा जास्त झाली. प्रत्येक दिवसाला हॉस्पिटल चालविण्याचा खर्च (रनिंग कॉस्ट) 1 लाख होती. याशिवाय बाहेरून औषधे आणावी लागत होती. संपूर्ण रुग्णालयाला पुरेल एवढी वीज निर्मिती करणारा जनरेटर 24 तास  उभा होता. त्यातच फायर ऑडिटसाठी 75 हजार रुपये मोजावे लागले. रेमडेसीवर इंजेक्शनचा कोटा मंजूर होईल त्या ठिकाणाहून रोज इंजेक्शन आणण्यासाठी जावे लागत होते.
त्यामुळे केवळ गुंतवणूक केल्यावर सर्व सुरळीत चालेल अशी केलेली कल्पना फोल ठरली. रोजचा दिवस नवा खर्च घेवून उजाडत होता. आणि पैसे कसे वाचतील याचा विचार करायला वेळ हातात नव्हता. अशा परिस्थितीत जी 13 समुहाने हे शिवधनुष्य 39 दिवस पेलले.
यश मिळाले
गुहागर तालुक्यात वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांसाठी हे नेहमीचे काम नसल्याने अडचणीत भर पडत होती. दुसऱ्या बाजुला आयसीयूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत होती. त्यामुळे  एप्रिल महिन्यात अक्षरश: घर वाऱ्यावर सोडून डॉक्टर केवळ कोविड रुग्णालयाचा विचार करत होते. त्याच्या मेहनतीला यश मिळाले. 39 दिवसांच्या कालावधीत शृंगारतळी कोविड केअर सेंटरमध्ये एकूण 138 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी 20 रुग्णांना अधिक उपचारांसाठी अन्यत्र पाठवावे लागले. 10 अत्यवस्थ स्थितीत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. तर 108 रुग्ण उत्तम स्थितीत बरे झाले.
म्हणून रुग्णालय बंद केले
राज्य शासनाने 13 एप्रिलला लॉकडाऊन सदृष्य निर्बंध लागू केले. त्याचा फायदा 15 मे नंतर जाणवू लागला. गुहागर तालुक्यात 700 च्यावर पोचलेली कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख हळूहळू खाली येवू लागला. 15 मे नंतर शृंगारतळी कोविड रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होवू लागली.  एक वेळ अशी आली की रुग्णालयात केवळ ३ रुग्णच उपचार घेत होते. गुहागर तालुका जिल्ह्यापासून 40 कि.मी.वर असल्याने अन्य तालुक्यातून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही स्वाभाविकपणे घटली होती. अशावेळी प्रति दिन 1 लाख खर्च असलेल्या रुग्णालय चालू ठेवणे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे उपचार घेणारे रुग्ण बरे झाल्यावर डॉक्टरांनी हे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
आर्थिक गणित तोट्याचे
रुग्णसंख्या वाढल्यानंतर स्वत:च्या दवाखान्यातील कॉट सुध्दा या रुग्णालयात आणून ठेवण्याचे काम या डॉक्टरांनी केले होते.  रुग्णालय बंद झाल्यानंतर आकड्याचे गणित डॉक्टर मांडू लागले तेव्हा मात्र डॉक्टरांची चिंता वाढली. सप्टेंबर 2020 मध्ये 13 डॉक्टरांनी 50 हजार रुपयांचा ( 6 लाख 50 हजार) तोटा सहन केला होता. यावेळी सुमारे 5 लाखांची येणेबाकी आहे. आम्ही नक्की पैसे देतो सांगून गेलेले रुग्ण पैसे परत देईपर्यंत किती काळ लोटणार माहिती नाही. 20 लाख रुपयांची थेट  गुंतवणूक झाली आहे. वैद्यकिय उपकरणे परत विकली तर पैसे मिळतील. पण ती किती रक्कमेला विकली जाणार आणि कधी विकली जाणार माहिती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत दिसणारा तोटा 31 लाख 50 हजार रुपयांचा आहे. यामध्ये रुग्णांकडून शासकीय दराने घेतलेल्या फी मधुन कर्मचाऱ्यांचा पगार, ऑक्सिजनचे भाडे आदी खर्च करुन झाले आहेत. तरीही अजुन काही औषध विक्रेत्यांकडून बीले येणे बाकी आहेत.
डॉक्टर व्यथीत
गुहागर तालुक्यासह वैद्यकिय वर्तुळातून शृंगारतळी कोविड रुग्णालयाबाबत विविध टिका सुरु झाल्या. या डॉक्टरांना खर्च किती होणार हे माहिती नव्हते का, शासन व लोकप्रतिनिधींना सांगून सीएसआरमधुन पैसे उभे करता आले नसते का. इथपासून किती कमावले, आजपर्यंत कमावलेच ना या टोकापर्यंत चर्चा पोचल्या.  या चर्चा डॉक्टरांच्या जी 13 समुहापर्यंत पोचल्या तेव्हा रुग्णसेवा करणारे डॉक्टर मनापासून व्यथीत झाले. कारण हे डॉक्टर केवळ कोविड रुग्णालय चालवत नव्हते तर गुहागर तालुक्यातील अनेक रुग्णांची चौकशीसुध्दा करत होते. त्या रुग्णांनी आपल्या रुग्णालयात उपचार घेतले किंवा नाहीत याच्याशी त्यांचे देणेघेणे नव्हते. गुहागर तालुक्यातील रुग्ण बरा झाला पाहिजे ही भावना होती. त्यांनी कौतुकाच्या दोन शब्दांची अपेक्षा केली नाही. अपेक्षा होती आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणण्याची. पण शुध्द अंत:करणाने रुग्णसेवा करुनही आरोपांचा चिखल त्यांच्यावर उडाला तेव्हा आता बास्स… ही त्यांची मनस्थिती झाली आहे.
पुढे काय…. दुसऱ्या लाटेतील धुरळा बसु लागल्यावर आता कोरोनाबाबतची चिंता तात्पुरती का होईना मिटली आहे. प्रत्येकजण पुन्हा आपले व्यवहार रुळावर कसे आणता येतील याची चिंता करु लागला आहे. पण ती तिसरी लाट आली तर गुहागरवासीयांचे काय, एकही वैद्यकिय रुग्णालय नसलेल्या या तालुक्याने दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रौद्ररुप पाहिले आहे. जर भविष्यात तिसरी लाट असेच रौद्र रुप घेवून आली तर वेळणेश्र्वर आणि नव्याने सुरु झालेले आरजीपीपीएल कोविड केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णालय ही लाट थोपवून धरण्यासाठी पुरेसे आहेत का. 31 लाखांचा तोटा आणि प्रामाणिक प्रयत्नांवर चिखलफेक झाल्यानंतरही शृंगारतळी कोविड रुग्णालय सुरु होईल असे आपल्याला वाटते का.  आज असलेले 18 आयसीयु क्षमतेचे खासगी रुग्णालय पुरेसे आहे का. असे अनेक प्रश्र्न आहेत. उत्तरे आपल्यालाच शोधावी लागणार आहेत. अन्यथा…..

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.