अजित बेलवलकर : दुकाने बंद केली नाही तर गुन्हे दाखल करु
गुहागर, ता. 02 : ताबडतोब दुकाने बंद केली नाहीत तर गुन्हे दाखल करु. अशी धमकी गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी दिली असल्याचा आरोप शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजीत बेलवलकर यांनी केला आहे. या धमकीनंतर आम्ही 15 मे पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असेही अजीत बेलवलकर यांनी सांगितले. ( Ajit Belwalkar, president of Shringartali traders’ association, has made the allegation of threat given by Tehsildar Guhagar. After this issue All Traders take decision – Shringartali Market will Closed till 15th May from Monday 3 May, 11 A.M.)


गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरु असतात. मात्र या दुकानांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी पाहून गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे संतापल्या. त्यांनी श्रृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांना सकाळी 10.30 वा. फोन केला. मी शृंगारतळीच्या बाजारपेठतच उभी आहे. येथे दुकाने सुरु झाल्यामुळे लोकांची गर्दी आहे. त्यामुळे ताबडतोब दुकाने बंद करावीत. अन्यथा सर्व दुकानांवर गुन्हे दाखल केले जातील. असे सांगितले. यावेळी बेलवलकर म्हणाले की, शासनाच्या आदेशाप्रमाणे सकाळी 7 ते 11 या वेळेतच किराणा माल, भाजी, खाद्यपदार्थ यांची दुकाने सुरु असतात. मोबाईल शॉपी, कापड दुकाने आदी सर्व दुकाने बंदच आहेत. ही दुकाने 11 नंतर बंद करण्यात येतील तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. मात्र तहसीदार ऐकुन घेण्याच्या तयारीत नव्हत्या.


तहसीलदारांचे म्हणणे : धमकी नव्हे सूचना केली (बातमी वाचण्यासाठी लाल रंगातील वाक्यावर क्लिक करा.)
या प्रसंगानंतर अजीत बेलवलकर यांनी सर्व व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. तहसीलदारांबरोबर झालेला संवादही सांगितल्या. त्यानंतर सर्वच व्यापाऱ्यांनी शृंगारतळी बाजारपेठेत सोमवार 3 मे रोजी दुपारी 11 वाजल्यापासून 15 मे पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अजित बेलवलकर म्हणाले की, गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका शृंगारतळीमधील व्यापाऱ्यांनी घेतली. प्रसंगी व्यापाऱ्यांनी शिधा वाटप केले. पोलीस प्रशासनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. रेनेबो येथे कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी देखील व्यापाऱ्यांनी निधी दिला. शृंगारतळी परिसरात कोरोना वाढत असल्याचे लक्षात आल्यावर तीन वेळा व्यापाऱ्यांनी पुढे येवून बाजारपेठ बंद केली. मात्र हे सारे विसरुन तहसीलदार ज्या पध्दतीने बोलल्या त्याने व्यापारी दुखावले आहेत. त्यामुळे बाजारपेठ पूर्णपर्ण बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे जनतेची होणारी अडचण प्रशासन सोडवले.