उपअभियंता अपूर्वा पाटील, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सल्लागार नेमला
गुहागर, 02 : पालशेतच्या पेरिअर्बन पाणी योजेनच्या कामावर आमचे लक्ष आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प (Filtration Project) योग्यरितीने व्हावा यासाठी आम्ही ठेकेदाराला सल्लागारही दिला आहे. उत्तम दर्जाची पाणी योजनाच पालशेत ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली जाईल. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चिपळूणच्या उपअभियंता अपूर्वा पाटील यांनी दिली.
पालशेत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्र्नांची उत्तरे अपूर्वा पाटील यांनी दिली. त्या म्हणाल्या की, पाणी योजनेचे काम विलंबाने सुरु आहे. ही गोष्ट मान्यच करावी लागेल. कोरोना संकटातील दोन महिन्यांची टाळेबंदी, त्यानंतरही सामुग्री मिळण्यात येणारे अडथळे यामुळे पाणी योजनेचे (Delayed Water Scheme) काम लांबत आहे. 31 मार्च 2021 ही अंतिम मुदत ठेकेदाराला देण्यात आली आहे. मात्र या मुदतीतही पाणी योजनेचे काम पूर्ण होण्याची आजतरी स्थिती नाही. यापूर्वी ठेकेदाराने कामाला विलंब केला. त्याबद्दल जीवन प्राधिकरणने दंडात्मक कारवाईची दोन सूचनापत्रे ठेकेदाराला पाठवली आहेत. कामाच्या दर्जावर आमचे अधिकारी पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. नव्या टाक्या बांधल्यानंतर त्याची तपासणी आमच्या अभियंत्यांनी केली. त्यावेळी एका टाकीला गळती असल्याचे समोर आले. पोमेंडी फाटा येथील रस्त्याच्या कामात जलवाहिनी दाबली गेल्याची भिती ग्रामपंचायतीने व्यक्त केली होती. त्यावेळीही संयुक्त पहाणी केली. पालशेत पाणी योजनेचे काम उत्तम दर्जाचे होण्यासाठी आम्ही लक्ष ठेवून आहोत. नव्या टाक्यांना प्लास्टर केल्यानंतर टाळेबंदी घोषित झाल्याने ठेकेदाराला पाणी मारता आले नाही. आता नव्याने प्लास्टर करुन घेण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
जीवन प्राधिकरणाच्या नियमांप्रमाणे योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण योजनेची तपासणी केली जाते. त्यामध्ये सर्व जलवाहिन्यांमध्ये (Water Pipe Line) दिडपट दाबाने पाणी भरुन हायड्रोलिक टेस्ट (Hydraulic Test) घेतली जाते. या तपासणीमध्ये जलवाहिनीला असलेली गळती लक्षात येते. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास जलवाहिन्या फुटतात. अशा तपासणीनंतर समोर येणाऱ्या त्रुटी ठेकेदाराकडून दूर करुन घेतल्या जातात. तसेच योजनेचे काम पूर्ण झाल्यावर वर्षभर ही योजना ठेकेदारने चालविणे बंधनकारक आहे. वर्षभरानंतर ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या तर्फे योजनेची संयुक्त तपासणी केली जाते. या तपासणीनंतर, ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केल्यावरच ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात येते. त्यामुळे पालशेतवासीयांना उत्तम दर्जाची पाणी योजनाच दिली जाईल. असे आश्र्वासन उपअभियंता अपूर्वा पाटील यांनी दिले आहे.