लेखक : मयूरेश पाटणकर
गुहागर, न्यूज : 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपल्या देशात आणिबाणी जाहीर झाली. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 1 वर्ष 9 महिन्यांच्या कालावधीत आपल्या देशातील सर्वसामान्य माणसापासून ते पत्रकार, राजकारणी, समाज सुधारक या सर्वांचा जगण्याचाच मुलभूत अधिकार (Fundamental Rights) काढून घेण्यात आला होता. अनेक लेखक, पत्रकार, कलाकार, महिला कार्यकर्ते, समाजसुधारक आणि बुद्धिजीवी वर्गालाही अत्याचार, दडपशाही आणि सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला. न्याय व्यवस्थेचा आवाजही बंद करण्यात आला होता. देशाचे सर्वोच्च पदी विराजमान असलेले राष्ट्रपती हे देखील केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनले होते. सर्वांर्थाने आपल्या देशात हुकुमशाही किंवा एकछत्री राजवट सुरू झाली होती. या राजवटीमध्ये केंद्र सरकारविरुध्द जो बोलेल तो गुन्हेगार ठरवला जात होता. The Emergency


माणुसकीची हत्या करणारे अत्याचार
मिसा (MISA – Maintenance of Internal Security Act) या कायद्याचा गैरवापर करून कोणालाही कोणत्याही कारणाशिवाय अटक करता येत होती. ही अटक आजकाल होणाऱ्या आंदोलनकर्त्यांना होणाऱ्या अटके इतकी साधी नव्हती. तर आपल्याच देशाचे नागरिक असलेल्या पोलीसांनी यावेळी अटक केलेल्यांवर अन्ववीत अत्याचार केले. पोलीस तुरुंगात थर्ड डिग्री वापरतात म्हणजे गुन्हेगाराला मारतात एवढंच आपल्याला माहिती आहे. मात्र आणिबाणीच्या काळात याच पोलीसांनी क्रुरतेची सीमा गाठली होती. मिसा खाली अटक झालेल्या अनेकांना दोरखंडाने खाद्यांत बांधुन लटवले जायचे. त्यांच्या पायावर लाठीमार केला जायचा. नारळाच्या सोडणात किडे सोडून ते सोडण पुरुषांच्या बेंबीजवळ आणि महिलांच्या स्तनांजवळ बांधले जायचे. पुरुषांच्या नखांमध्ये सुया टोचल्या जायचे. असे अत्याचार उर्वरित कैद्याच्या समोर केले जायचे. याचा परिणाम म्हणून अनेक तरुण तरुणी आपल्या उर्वरित जीवनात अपंग झाले, मेंदुवर परिणाम झाला. उर्वरित आयुष्य दिर्घ आजाराला सोबत घेवून जगण्याची नौबत काहीजणांवर आली. याचे कारण फक्त एकच होते ते केंद्र सरकारच्या विरोधात बोलत होते. याचे उदाहरण म्हणजे दलित हक्कासाठी काम करणाऱ्या मुंबईतील गौतम कांबळे यांना सरकारविरोधी वक्तव्य केल्याबद्दल अटक झाली. त्यांना तासनतास पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आली. वरीलप्रमाणे छळ करण्यात आला. या अनन्वीत अत्याचारातून बाहेर पडलेले गौतम कांबळे तुरुंगातून सुटल्यावर घराबाहेर पडू शकले नाहीत. सौराष्ट्रतील सत्यनारायण पाटील नावाच्या युवकाला तुरुंगात बेछूट मारहाण करण्यात आली होती. शिवाय अन्न पाण्याशिवाय तुरुंगात अनेक तास उभे करुन ठेवणे, वीजेचे झटके देणे अशाही शिक्षा करण्यात आल्या. आणिबाणीच्या विरोधात संपूर्ण देशात चळवळ उभी करणारे जयप्रकाश नारायण (JP) यांना मिसाखाली अटक केल्यानंतर अन्नपाण्याशिवाय ठेवले गेले. मारहाण करण्यात आली. परिणामी मूत्रपिंडावर (kidneys) परिणाम झाला आणि त्या त्रासातून ते आयुष्यभर बाहेर पडले नाहीत. The Emergency


1 कोटीहून अधिक पुरुषांची नसबंदी
हे अत्याचार कमी असावेत म्हणून की काय जनसंख्या नियंत्रणासाठी बळजबरीने 1 कोटीहून अधिक पुरुषांची नसबंदी केली गेली. देशात अनेक ठिकाणी गरिबांना शासकीय सुविधा बंद करण्याची भीती दाखवून नसबंदी करण्यात आली. बळजबरीची नसबंदी मोहीम किती अमानवी होती की, उत्तरप्रदेशमधील अलाहाबादमध्ये रहाणाऱ्या 70 वर्षिय गौरहार मेहता या महिलेची भुल न देता नसबंदी करण्यात आली. गोंडा (UP) येथे अर्जुनलाल नावाच्या शेतकऱ्याला बाजारातून ओढून नेत नसबंदी केली गेली. The Emergency


दिल्ली शहरातील सुधारणा आणि स्वच्छतेच्या नावाखाली १९७६ साली तुर्कमान गेट परिसरात झोपडपट्ट्या हटवण्याची मोहिमी हाती घेण्यात आली. यामुळे अनेक लोक बेघर होणार होते. म्हणून या मोहिमेला स्थानिक लोकांनी विरोध केला. तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये १०० हून अधिक लोक मृत, अनेक जखमी झाले. बुलडोझरने घरे उद्ध्वस्त करताना लोक आत होते, त्यामुळे गंभीर शारीरिक इजा आणि मृत्यू झाला. The Emergency
आणिबाणी का लागली, कोणी लावली, या चर्चामध्ये आपण शिरलो तर त्याला राजकीय विचारांचा स्पर्श होतो. प्रस्तुत लेखाद्वारे मला आजच्या तरुणांना आणिबाणी नेमकी काय होती, दरवर्षी या आणिबाणीवर चर्चा का होते. हे सांगायचे आहे. टक्केवारीत विचार करायचा झाला तर देशातील 90 % जनता आणिबाणीच्या विरोधात होती. पण त्याचवेळी संपूर्ण देशात म्हणजेच देशाच्या ग्रामीण भागातही आजच्या सारखी माध्यमांची मांदियाळी नसतानाही, आणिबाणीच्या बाजुने असलेल्यांची संख्याही होतीच. The Emergency


आज 50 वर्षांपूर्वी ज्यांनी छळ सोसले अशी अनेक मंडळी जिवंत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोरुन हा काळा कालखंड जाऊच शकत नाही. संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत असताना याच संविधानाला लागलेला हा तीव्र धक्का काय आहे हे देखील आजच्या तरुण पिढीने समजून घेतले पाहीजे. आणिबाणीच्या कालखंडावरील अनेक पुस्तके विविध भाषात उपलब्ध आहेत. परंतू आजची पिढी दिर्घवाचनाच्या फंदात पडत नाही म्हणून प्रस्तुत लेखाची मांडणी मी केली आहे. The Emergency