प्रकाश देशपांडे, राजेंद्र आरेकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
गुहागर, ता. 27 : कवितेला अलंकाराची गरज नसते अलंकारामुळे कवितेला जडत्व येते व त्यामधील आशय हरवून जातो कविता साधी सोपी असावी त्यामध्ये आंतरिक भाव भावना दिसतात म्हणून अशा कविता सर्वांना भावतात असे प्रतिपादन लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले गुहागर मधील राजेंद्र आरेकर यांच्या ”साद आईस” या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
गुहागरमधील ज्ञानरश्मी वाचनालय आणि मराठी साहित्य परिषद शाखा गुहागर या संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या साद आईस या दुसऱ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी झाले. या प्रकाश सोहळ्याचे अध्यक्षस्थानी लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे होते. ते पुढे म्हणाले की, आरेकर यांचा आई हा पहिला कविता संग्रह आल्यानंतर आता साद आईस या संग्रहाचे प्रकाशन झाले आहे. या कवितांना गेयता आहे. शाळांमध्ये या कविता वेगवेगळ्या निमित्ताने गायल्या जाव्यात इतक्या त्या प्रभावी आहे. (SAD Aais Publication of poetry collection)


SAD Aais Publication of poetry collection
कवितासंग्रहाचे प्रकाशन करणारे कवी, प्रा. अरुण इंगवले म्हणाले की, कविता ही निर्गुण असते. कोणत्याही कवितेचा अर्थ प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे बदलु शकतो. राजेंद्र आरेकर यांच्या कवीतांचा परिघ व्यापक होतोय. त्यांची प्रत्येक कविता अर्थपूर्ण आहे. संवेदना आणि सहवेदना असल्याशिवाय कवी होता येत नाही. त्याच्या कविता स्वान्तसुखाय म्हणजे स्वत:च्या आनंदासाठी लिहिलेल्या असल्यातरी त्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजणाऱ्या आहेत. म्हणूनच त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करावा असे मला वाटले. अजुनही त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता आहे. त्या माझ्यापर्यंत पोचल्या तर त्यांचा आणखी एक कवितासंग्रह प्रकाशित करता येईल. तो लवकरात लवकर प्रकाशित व्हावा असे मला वाटते.


प्राध्यापिका अंजली बर्वे यांनी कविता संग्रहाचे अंतरंग उलगडून सांगितले. राजेंद्र आरेकर यांनी अनेक विशेषणे, उपमा यांचा चपखल वापर करताना कविता लिहिण्याचे शास्त्रही सांभाळले आहे. त्यामुळेच हा काव्य संग्रह नाही तर कवितासंग्रह आहे. यातील प्रत्येक कविता चाल लावून गुणगुणता येते. आई, साद आईस् या दोन कवितासंग्रहांनंतर आता आईच्या आठवणी उलगडून दाखविणारा कथासंग्रह राजेंद्र आरेकर यांनी प्रकाशित करावा. अशी विनंती प्रा. अंजली बर्वे यांनी केली.
नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, माणुस व्यापात अडकला की छंद, आवडीनिवडी विसरुन जातो. आमच्या सारख्या नोकरी व्यवसाय सांभाळून राजकारण करणाऱ्या व्यक्तींना साहित्याची आवड असली तरी पूर्ण करता येत नाही. मात्र एका राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष, शेतकरी, निवृत्त एस.टी. कर्मचारी, मसापचे तालुकाध्यक्ष, ज्ञानरश्मीचे अध्यक्ष अशा विविध भुमिका निभावणाऱ्या राजेंद्र आरेकर यांनी दुसरा कवितासंग्रह प्रकाशीत केला. ही गुहागरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कवि राष्ट्रपाल सावंत यांनी कवितासंग्रहाचे कौतुक करतानाच वर्षभरात या कवितांच्या गायनाचा कार्यक्रम आपण करु असे आश्र्वास आरेकर यांना दिले.
कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मसाप शाखा गुहागर आणि ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर यांच्यावतीने राजेंद्र आरेकर यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. मसाप चिपळूण शाखा, ज्ञानरश्मी वाचनालयातील वाचक, आरेकरांचा मित्र परिवार यांनी देखील राजेंद्र आरेकर यांचा सत्कार करत साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेश बेंडल, मसाप गुहागर व ज्ञानरश्मी वाचनालयाचे पदाधिकारी आणि गुहागरमधील साहित्यप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राशिनकर सर, सूत्रसंचालन मनाली बावधनकर, तर मानपत्राचे वाचन सुधाकर कांबळे यांनी केले.
राजेंद्र आरेकर यांच्या निवडक कविता चालीमध्ये ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

