उमेश भोसले, नगराध्यक्षांची वेळकाढुपणाची भुमिका अडचणीची
गुहागर, ता. 23 : विकास आराखडा करण्यासाठी 2021 मध्ये नगरपंचायतीला सांगण्यात आले होते. मात्र नगराध्यक्षांनी तेव्हापासून वेळकाढुपणा केला. आता नगररचनाकार रत्नागिरी यांनी तयार केलेला आराखडा प्रसिध्द करण्यास टाळाटाळ सुरु आहे. वेळ निघून गेली तर शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे नगरपंचायतीने हा विकास आराखडा जनतेसमोर मांडावा. अशी मागणी भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी केली आहे. Publish the DP
आजच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विकास आराखडा प्रसिध्द करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. याबाबत बोलताना उमेश भोसले म्हणाले की, जानेवारी 2021 मध्ये शासनाने नगरपंचायतीला विकास आराखडा तयार करण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु त्याकडे नगराध्यक्षांनी गांभिर्याने पाहिले नाही. नगराध्यक्ष कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कचरतात. हे आजपर्यंत अनेक वेळा समोर आले आहे. आमचा विकासाला विरोध नाही पण नुकसान नको ही नगराध्यक्षांची दुटप्पी भुमिका योग्य नाही. 31 जानेवारी पर्यंत विकास आराखड्याची प्रक्रिया नगरपंचायतीने पूर्ण केली नाही तर गुहागरवासीयांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे.Publish the DP
आजच्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील आरक्षणांचा अभ्यास नगरपंचायतीमध्ये करत होता. नगर रचना विभागाचे अधिकारी जगदाळे उपस्थित नगरसेवकांना तपशीलात माहिती देत होते. त्यामुळे अनेक नगरसेवकांना हा विकास आराखडा समजला. हीच व्यवस्था नगराध्यक्षांनी पुढाकार घेवून आधी केली असती तर आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठोस निर्णय घेता आले असते. मात्र नगराध्यक्ष बेंडल यांनी स्वत:ची भुमिका निश्चित करुन त्याप्रमाणे नकारात्मक वातावरण निर्मिती केली. परिणामी महत्त्वाच्या आवश्यक बदलांबाबत चर्चाच झाली नाही. Publish the DP
विहीत मुदतीत विकास आराखडा मंजूर झाला नाही तर राज्य सरकार देईल तो नगर रचनाकार या विकास आराखड्याला प्रसिध्दी देईल. त्यानंतर हरकती घेण्यासाठी गुहागरच्या नागरिकांना त्या नगररचनाकारांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतील. त्या हरकतींवर निर्णय घेत होत नाही तोपर्यंत ते आरक्षण तसेच राहील. याचे उदाहरण म्हणजे चिपळूण. पाच वर्ष संपली तरी चिपळूणमधील अनेक हरकतींवर निर्णय झालेले नाहीत. Publish the DP
गुहागर नगरपंचायतीने विकास आराखडा प्रसिध्द केला म्हणजे तो मंजूर झाला असे नाही. नागरिकांना हरकती घेण्यासाठी तब्बल एक महिन्याची मुदत आहे. या हरकतींची सुनावणी नगरपंचायतीने बनविलेल्या समितीसमोर होणार आहे. त्यामध्ये नगरपंचायतीच्या स्थायी समितीचे 3 सदस्य आहेत. त्या समितीसमोर गुहागरचे नागरिक सहजतेने आपले म्हणणे मांडु शकतात. या एक महिन्याच्या काळात विकास आराखड्यातील त्रुटी नगरपंचायत मांडू शकते. या सर्व गोष्टी वेळेपूर्वी झाल्यातर नगररचनाकार विभागाशी संवाद साधुन बदललेला आराखड्याचे पुर्नविलोकन गुहागर नगरपंचायतीला पुन्हा करता येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता लवकरात लवकर नगरपंचायतीने हा विकास आराखडा जनतेसमोर मांडावा. अशी मागणी भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी केली आहे.
